श्रीवल्ली…गाण्याची पाच लाखांहून अधिक रील्स | पुढारी

श्रीवल्ली...गाण्याची पाच लाखांहून अधिक रील्स

पुढारी ऑनलाईन

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाच्या ‘पुष्पा ः द राईज’ने सध्या देशभरातील प्रेक्षकांवर मोहिनी घातली आहे. या चित्रपटातील गाणी सध्या सर्वांच्याच तोंडी रुळली आहेत. ‘श्रीवल्ली…’ ‘सामी, सामी..’, ‘ये मेरा अड्डा..’ ही हिंदी गाणी आणि त्यातील डान्सवरून अनेकांची रोजची सोशल मीडिया स्टेटस सध्या अपडेट होत असतात.

श्रीवल्ली … या गाण्याची सोशल मीडियात पाच लाखांहून अधिक रिल्स (छोटे व्हिडिओ) बनली आहेत. यापैकी ‘श्रीवल्ली…’चा गायक जावेद अलीने एका मुलाखतीत या गाण्याचा प्रवास उलगडला. जावेद खरेतर संगीतकार इलैया राजा यांना भेटण्यासाठी चेन्‍नईत गेला होता. तेव्हा त्याला संगीतकार श्री देवी प्रसाद यांनी ‘श्रीवल्ली..’ गाण्यासाठी बोलावून घेतले आणि इलैया राजा यांचा फोन आला, तर मधूनच गेलास तरी चालेल, असे सांगितले. त्यादिवशी इलैया राजा यांचा फोन आलाच नाही आणि अडीच तासांत ‘श्रीवल्ली…’चे रेकॉर्डिंग पूर्ण झाले.

हे गाणे गाण्यासाठी पाच गायकांची नावे चर्चेत होती; पण श्री देवी प्रसाद यांनी मला संधी दिली. रेकॉर्डिंगवेळी ‘श्रीवल्ली’ हे नाव दाक्षिणात्य वाटेल म्हणून आम्ही त्याऐवजी ‘श्रीदेवी’ हा शब्द घालूनही एक गाणे बनवले होते.

Back to top button