Titanic : ‘टायटॅनिक’ची दुर्घटना घडण्यामागे होती ‘ही’ अनेक कारणे | पुढारी

Titanic : ‘टायटॅनिक’ची दुर्घटना घडण्यामागे होती ‘ही’ अनेक कारणे

लंडन : ‘कधीही न बुडणारे जहाज’ अशी जाहिरात करून सुमारे 112 वर्षांपूर्वी एक भव्य जहाज इंग्लंड ते अमेरिका प्रवास करण्यासाठी निघाले. साऊथम्प्टन ते न्यूयॉर्क असा प्रवास करण्यासाठी निघालेले हे जहाज आपल्या पहिल्याच सफरीत, अवघ्या चारच दिवसांच्या प्रवासानंतर हिमनगाला धडकून अटलाटिक महासागरात बुडाले. टायटॅनिक इंग्लंडच्या साउथम्प्टन येथून 41 किलोमीटर प्रतितास वेगाने अमेरिकेतील न्यूयॉर्ककडे जात असताना हा अपघात घडला. 14 आणि 15 एप्रिल 1912 च्या मध्यरात्री टायटॅनिक अटलांटिक महासागरात बुडाले. या अपघातात सुमारे 1500 लोकांचा मृत्यू झाला. 110 वर्षे उलटून गेली तरी हा सर्वात मोठा सागरी अपघात मानला जातो. सप्टेंबर 1985 मध्ये या जहाजाचे अवशेष अपघाताच्या ठिकाणाहून हलवण्यात आले. हा अपघात कॅनडापासून 650 किलोमीटर अंतरावर 3,843 मीटर खोलीवर झाला होता. अपघातात जहाजाचे दोन तुकडे झाले आणि दोन्ही भाग एकमेकांपासून 800 मीटर दूर अंतरावर होते. या दुर्घटनेला 112 वर्षे उलटून गेली मात्र आजही हा अपघात एक रहस्य आहे.

या अवाढव्य जहाजाबद्दल असे म्हटले जात होते की, ते बुडण्याची शक्यताच नव्हती. देवही त्याला बुडवू शकत नव्हता. हा विश्वास निर्माण झाला होता कारण त्याला कारणंही तशीच होती. फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ रिओ डी जनेरियो येथील नौदल आणि महासागर अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक आणि अभियंता अलेक्झांडर डी पिन्हो अल्हो सांगतात, ‘या जहाजात अनेक वॉटरटाइट कंपार्टमेंट्स बांधण्यात आले होते. म्हणजे जर जहाजाची एक खोली पाण्याने भरली तरी दुसरी खोली पाण्याने भरणार नाही.‘हे जहाज तयार करताना काही अडचणी आल्या. विजेच्या तारा आणि पाण्याचे पाइप व्यवस्थित काम करत राहावेत यासाठी त्या जहाजाची उंची किती ठेवावी यावर बराच विचारविनिमय झाला.

प्रोफेसर अल्हो यांच्या म्हणणर, ‘शेवटी विचारांती जहाजाची उंची ठरवली. जरी जहाजात पाणी शिरले तरी हे पाणी छताच्या उंचीपर्यंत पोहोचणार नाही यावर ही त्यांनी विचार केला. त्यांनी छतावर सुरक्षित कंपार्टमेंटस् ही बनवले, ‘पण तेव्हा हिमनागशी भीषण टक्कर होईल याचा विचार कोणी केला नसेल. प्रोफेसर अल्हो सांगतात, ‘हिमनगाचा आघात इतका जोरदार होता की जहाजाचा मुख्य भाग असलेल्या लांबीच्या अर्ध्यापर्यंत खोच पडली आणि या स्थितीत पाणी छतापर्यंत पोहोचले. ‘जहाज पूर्णपणे पाण्याने भरले होते. अशा परिस्थितीत बचाव करणे शक्य नव्हते. तुम्ही जहाजातले पाणी काढण्यासाठी सर्व पंप कार्यान्वित करू शकता, तुम्ही हरप्रकारे प्रयत्न करू शकता, पण ज्या वेगाने पाणी आत येत त्याच वेगाने ते बाहेर पडू शकत नव्हतं.’

फ्लुमिनेन्स फेडरल युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक आणि वाहतूक अभियंता ऑरिलो सोरास मूर्ता यांच्या मते, ‘टायटॅनिकची वॉटर टाईट कंपार्टमेंट बंद करण्याची यंत्रणा देखील योग्यरित्या काम करत नव्हती.’ त्या काळी जहाज बनवण्यासाठी वापरण्यात येणारा धातू सध्याच्या स्टीलइतका मजबूत नव्हता. सोरास मुर्ता पुढे सांगतात की, ‘जोरदार टक्कर झाल्यानंतर जहाजाची रचनाही बदलली. दरवाजे ही बंद होत नव्हते, ते अडकले होते.

त्या काळातही टायटॅनिक शुद्ध स्टीलचे बनले होते, पण त्यावेळचे स्टील आजच्या स्टीलइतके मजबूत नव्हते.‘साओ पाओलो येथील मॅकेन्झी पेर्सेबायटेरियन युनिव्हर्सिटीमधील धातूविज्ञानाचे प्राध्यापक जॉन वैतावुक स्पष्ट करतात की, ‘1940 च्या दशकापर्यंत जहाजाचा मुख्य भाग हा धातूच्या शिटस्चा बनलेला असायचा; मात्र नंतरच्या काळात या जहाजाचे मुख्य भाग तयार करण्यासाठी धातू वितळवून वापरण्यात आले. वैतावुक सांगतात, ‘तो काळ आणि आताच काळ यांची तुलना केली तर तंत्रज्ञान आणि साहित्यात बरेच बदल झाले आहेत. आता धातू वितळवून शिटस् जोडल्या जातात. स्टील बनवताना कार्बनचा वापरही कमी होत आहे आणि मॅगनीजचा वापर वाढू लागला आहे. आजचे स्टील हे खूप मजबूत आहे.’

वैतावुक यांच्या मते, आजची जहाज पाण्याशी, समुद्राच्या लाटा आणि वादळांच्या चढउतारांशी जुळवून घेण्यास अधिक सक्षम आहेत. तज्ज्ञांच्या मते, हिमनगाने भरलेल्या भागातून जाण्यात अडचणी असतानाही हा प्रवास लवकर पूर्ण करण्यासाठी खूप दबाव होता. वास्तविक हा दबाव ‘ब्लू बँड’ मिळवण्यासाठी होता. 1839 च्या सुरुवातीस, हा मान अटलांटिक महासागर पार करणार्‍या सर्वात वेगवान जहाजाला दिला जायचा. टायटॅनिक ही या सन्मानाची प्रबळ दावेदार मानली जात होती. टायटॅनिक दुर्घटनेत सुमारे 1500 लोक मरण पावले. त्यानंतर सागरी जहाजांची सुरक्षा व्यवस्था सुधारण्याचे प्रयत्न सुरू झाले. या दुर्घटनेनंतर समुद्रात जाणार्‍या जहाजांच्या सुरक्षेसाठी रडारसारख्या उपकरणांच्या वापराची सुरुवात झाली.

Back to top button