भारताचा इंग्लंडवर विजय | पुढारी
कॅनबेरा : वृत्तसंस्था
कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नाबाद 42 धावा आणि गोलंदाजांनी केलेल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला संघाने टी-20 त्रिकोणीय मालिकेतील पहिल्या सामन्यात पाच विकेटस्ने विजय मिळवला.
भारतीय फिरकी गोलंदाज राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे व दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी दोन विकेटस् मिळवल्या. तर, राधा यादवने एका विकेटची कमाई केली. इंग्लंडच्या संघाने 20 षटकांत 7 बाद 147 धावसंख्येपर्यंत मजल मारली. आव्हानाचा पाठलाग करणार्या भारतीय संघाची सुरुवात समाधानकारक राहिली. 15 वर्षीय शेफालीने 30, जेमिमाह रॉड्रिंग्जने 26 आणि स्मृती मानधनाने 15 धावा केल्या. वेदा कृष्णमूर्ती (7) आणि तानिया भाटिया (11) यांना म्हणावी तशी चमक दाखवता आली नाही. शेवटच्या षटकात भारताला सहा धावांची आवश्यकता होती. यावेळी हरमनप्रीतने षटकार मारत तीन चेंडू शिल्लक असताना संघाला विजय मिळवून दिला.
त्यापूर्वी, इंग्लंड संघाच्या आघाडी फळीतील फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. एमी जोन्स (1) व डॅनी वियाट (4) लवकर बाद झाल्या. नताली स्किवेर (20) व फ्रान विल्यन (7) यांनादेखील अधिक वेळ मैदानावर थांबता आले नाही. इंग्लंडची अवस्था दहाव्या षटकांत 4 बाद 59 अशी होती. कर्णधार हिथर नाईटने 44 चेंडूंत 67 धावा केल्या. तिच्या या खेळीत आठ चौकार व दोन षटकारांचा समावेश होता. यष्टिरक्षक टॅमी ब्यूमोंटने 27 चेंडूंत 37 धावा करीत नाईटला साथ दिली.