लवंगी मिरची : आधुनिक प्रकाशपर्व! | पुढारी

लवंगी मिरची : आधुनिक प्रकाशपर्व!

काय म्हणताय मंडळी? दिवाळी मजेत सुरू आहे ना? सूर्योदयापूर्वीचे अभ्यंगस्नान आटोपले का? हो आटोपावेच लागते, घरचे झोपू देत नाहीत ना? आता दिवाळीत आणखी एक काम असणार तुम्हाला आणि ते म्हणजे, आलेल्या प्रचंड प्रमाणातील दिवाळी शुभेच्छा डिलीट करण्याचे. म्हणजे पूर्वी काय होतं ना, दिवाळीच्या दिवसांमध्ये लोक एकमेकांना प्रत्यक्ष भेटायचे, एकमेकांच्या घरी मनसोक्त फराळ करायचे, संध्याकाळी दिव्यांची आरास करायची, असे चार दिवस झाले की, संपली दिवाळी. त्यानंतर आली ग्रीटिंग कार्ड म्हणजे शुभेच्छापत्रे. पोस्टाचा संपूर्ण पत्ता मिळवून एकमेकांना ग्रीटिंग पाठवली जायची. आवर्जून पाठवलेल्या ग्रीटिंगमुळे ज्याने पाठवले त्याला आणि मिळेल त्याला, दोघांनाही खूप आनंद होत असे. नंतर ग्रीटिंगचे युग संपले आणि मोबाईल फोन आला. मग, भल्या पहाटे दिवाळीच्या शुभेच्छांचे फोन करण्याची सुरुवात झाली. विशेषत: व्याही व्याह्याना, जावई सासर्‍यांना, बाहेरगावी असतील तर मुले आपल्या आई-बापांना दिवाळीच्या पहिल्याच दिवशी शुभेच्छा देणारे फोन करू लागले.

काळाच्या ओघात फोन स्मार्ट झाले आणि तेवढ्यात त्यात व्हॉट्सअ‍ॅप नावाचे नवीन प्रकरण अस्तित्वात आले आणि मग सुरू झाला शुभेच्छांचा भडिमार. दिवे, आकाश दिवे, पणत्या, फटाके इकडून आलेले तिकडे आणि तिकडून आलेले इकडे भरपूर प्रमाणात पाठवले जाऊ लागले. बरे, अशा शुभेच्छा देण्यासाठी विशेष फारसा काही खर्चही होत नाही, संबंधही टिकून राहतात. आकाशदिवे, दिव्यांची माळ, लाईव्हमध्ये लुकलुकणारे दिवे हे सगळे इकडून तिकडे आणि तिकडून इकडे येऊ लागले आणि जाऊ लागले. बघा हं मंडळी, आम्हाला एक समजत नाही की, समजा दिवाळीच्या पहिल्याच दिवशी संपूर्ण दिवाळीच्या एकगठ्ठा शुभेच्छा म्हणून तुम्ही एखादा मेसेज पाठवला तर पुरेसे नाही का? व्हॉटस्अ‍ॅपचे व्यसन लागलेले लोक एक गठ्ठा एक मेसेज कधीच पाठवत नाहीत. ते रोज सकाळी त्या त्या दिवशीचे स्वतंत्र मेसेज पाठवतात. अरे बाबा पुरे ना? किती भडिमार करशील? वसुबारसच्या दिवशी गाय -वासराचे फोटो, लगेच धनत्रयोदशीला वेगळे फोटो, पाडव्याचे फोटो, लक्ष्मीपूजनाचे वेगळे फोटो, भाऊबीजेच्या दिवशी भावा-बहिणीच्या प्रेमाचे फोटो. यामुळे होते काय की, साधारण संपर्क असलेल्या माणसाच्या मोबाईलमध्ये दररोज चार-पाचशे आकाशकंदील, हजारएक पणत्या आणि किमान दोन-तीन हजार दिव्यांच्या माळा येऊन पडत असतात.

बर्‍याच लोकांचे मोबाईल दिवाळी शुभेच्छा आणि इतर मेसेजेसमुळे इतके भरून जातात की, मोबाईलला स्वतःला कळत नाही की, आपण कसे काम करावे आणि मग ते हँग होऊन बसतात. दसरा, दिवाळीत आपण घराची साफसफाई करतो तशी मोबाईलची पण साफसफाई करावी लागते. नाही तर तो काम करायला नकार देतो. आपल्या मोबाईलमधील गॅलरी नामक संग्रहालयातून चार-पाच हजार फोटो काढले नाहीत, तर मोबाईल अंगात आल्यासारखे करतो आणि वाटेल तसे वागायला सुरुवात करतो. दिवाळी नको; पण शुभेच्छा आवर अशी परिस्थिती निर्माण होते. एकदाच दिवाळीच्या पहिल्या दिवशी संपूर्ण दिवाळीच्या सगळ्या सणांच्या मिळून एक गठ्ठा शुभेच्छा द्या ना? नाही कोण म्हणतो? पण, दूधवाल्याने दुधाचा रतीब घालावा तसे दररोज दोन-चारशे मेसेज विविध लोकांना पाठवणार्‍या लोकांनाही काहीतरी पुरस्कार दिला पाहिजे. शुभेच्छाभूषण पुरस्कार, शुभेच्छारत्न पुरस्कार असे काहीतरी काढले पाहिजेत. म्हणजे, अशा प्रकारची गांधीगिरी करून शुभेच्छा पाठवणे कमी केले पाहिजे.

संबंधित बातम्या
Back to top button