महात्मा गांधींच्या हत्येसंदर्भात रणजित सावरकरांचा खळबळजनक दावा | पुढारी

महात्मा गांधींच्या हत्येसंदर्भात रणजित सावरकरांचा खळबळजनक दावा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : नथुराम गोडसेच्या गोळीने महात्मा गांधींची हत्या झालीच नाही, असा खळबळजनक दावा रणजित सावरकरांनी केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पणतु रणजित सावरकर यांच्या “मेक शुअर गांधी इज डेड” या पुस्तकाचे प्रकाशन दिल्लीतील महाराष्ट्र सदनात झाले. या पुस्तकात रणजित सावरकर यांनी हा दावा केला आहे. या पुस्तकात आणखीही अनेक खळबळजनक दावे करण्यात आले आहेत.  महात्मा गांधींच्या पुण्यतिथीच्या पुर्वसंध्येला हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले असुन यामुळे आता नवा वाद होण्याची शक्यता आहे.

७६ वर्षांपूर्वी महात्मा गांधींची हत्या झाली आणि या घटनेमुळे जगाचे राजकारण बदलले. मात्र या संदर्भात गेली सात वर्षे संशोधन करून मी हे पुस्तक लिहिले. यासाठी महात्मा गांधींच्या हत्येच्या कटाच्या चौकशीसंदर्भात नेमलेल्या कपूर आयोगाचा अभ्यास केला. या आयोगाचा अहवाल काँग्रेसने स्वीकारला नव्हता. तत्कालीन घटनेचा फॉरेन्सिक अहवाल ज्या गोळीवर आधारित आहे त्याचा फोटो आणि विश्लेषण देखील पुस्तकात जोडले आहे, असेही रणजित सावरकर यांनी सांगितले.

नथुराम गोडसे महात्मा गांधींना मारायला आला होता हे खरे आहे. मात्र त्याच्या पिस्तुलातून मारलेल्या गोळ्यांनी महात्मा गांधींची हत्या झाली नाही हेही तेवढेच खरे आहे, असाही दावा त्यांनी केला. तसेच या प्रकरणात नथुराम गोडसेची उलटतपासणीही झाली नव्हती. गोडसेने झाडलेली गोळी आणि ज्या गोळीने महात्मा गांधींचा मृत्यू झाला ती गोळी यांच्या आकारात फरक आहे. त्यामुळे तिसऱ्याच व्यक्तीच्या गोळीने महात्मा गांधींचा मृत्यू झाला, असा दावाही पुस्तकात करण्यात आला आहे.

“मेक शुअर गांधी इज डेड” हे पुस्तक प्रकाशित होऊ नये, यासाठी माझ्यावर दबाव आणला गेला. अनेक प्रकाशकांनी शेवटच्या क्षणी प्रकाशनाला नकार दिला. त्यामुळे मी हे पुस्तक स्वतः प्रकाशित केल्याचेही रणजित सावरकर म्हणाले. तसेच महात्मा गांधींच्या हत्येचा तपास पुन्हा नीट झाला पाहिजे ही मागणी लोकांनी करावी, मात्र मी केंद्राकडे तपासाची मागणी करणार नाही, हेही त्यांनी स्पष्ट केले.

महात्मा गांधींची अंत्ययात्रा ही सुनियोजित

रणजित सावरकर म्हणाले की “महात्मा गांधींच्या अंत्ययात्रेला मोठ्या प्रमाणात लोक आली होती असे सांगितले जाते मात्र त्यावेळी तिथे कुंभमेळा होता. महात्मा गांधींची अंत्ययात्रा ही सुनियोजित होती. लॉर्ड माऊंटबॅटनने त्यावेळी २०० सैनिक बोलावले होते. त्या सैनिकांनी तो रथ ओढला होता. तो सैनिकांना अपमान होता.”

पुस्तकात करण्यात आलेले दावे

  • महात्मा गांधींची हत्या नथुराम गोडसेने चालवलेल्या गोळीने झाली नाही
  • महात्मा गांधींना लागलेल्या गोळ्या वेगळ्या दिशेने आल्या होत्या
  • नथुराम गोडसे संघाचे स्वयंसेवक होते म्हणून संघावर आणि हिंदू महासभेवर बंदी घातली होती
  • महात्मा गांधींची हत्या प्रकरणातील पंचनामे खोटे बनवले आहेत
  • त्यावेळी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास नीट केला नाही

Back to top button