मुख्यमंत्री शिंदेंनी मराठा समाजाला न्याय दिला : जयदीप कवाडे
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : मागील अनेक वर्षापासून मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी प्रलंबित आहे. ही आरक्षणाची मागणी मुख्यमंत्री शिंदेच्या सरकारने आरक्षणात १० टक्के वाटा देऊन पूर्ण केली. मराठा आरक्षणावर शिंदे सरकारने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे आज (दि.२०) पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी स्वागत केले. आज राज्य सरकारने विशेष अधिवेशनात विधेयकाला मंजुरी दिली व मराठा समाजाला खरा न्याय देण्याचे काम केले, असे जयदीप कवाडे यांनी यावेळी स्पष्ट केले.
मराठा नेते शरद पवार आजपर्यंत जे करू शकले नाहीत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारने करून दाखविले आहे. आज (मंगळवारी) विशेष अधिवेशनात सरकारने मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात दिलेल्या १० टक्के आरक्षणाचा निर्णय अभूतपूर्व आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा आरक्षण विधेयक आज विधीमंडळाच्या पटलावर ठेवल्यावर सर्वांनाच एकमताने मंजूर करावे लागले. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता, मराठा समाजाला कायद्यात टिकणारं आरक्षण देण्याचे काम मुख्यमंत्री शिंदेंनी केले आहे, असेही जयदीप कवाडे म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे धाडसी निर्णय घेण्याची क्षमता आहे. तीन महिन्यात मराठा आरक्षणाचा तोडगा काढून त्यांनी राज्यातील कोट्यवधी समाज बांधवांच्या संघर्षाचा सन्मान केला. कोणताही दुजाभाव न करता त्यांनी हा निर्णय दिला आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
हेही वाचा :