महात्मा गांधींच्या स्वप्नातील भारत साकारण्याचे प्रयत्न यशस्वीतेकडे : देवेंद्र फडणवीस
वर्धा : पुढारी वृत्तसेवा महात्मा गांधी यांनी मांडलेली देशाच्या सर्वांगीण आणि सर्वसमावेशक विकासाची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यास सुरुवात झाली आहे. बापूंना अपेक्षित असलेले समाजाच्या शेवटच्या घटकाच्या जीवनातील परिवर्तनही दिसून येत आहे. या प्रयत्नांमध्ये समाजाच्या सर्व घटकांनी योगदान द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
चरखागृह येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महात्मा गांधी, विनोबा भावे यांच्या कर्मभूमीचा विचार संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक असून या विचारानुसार देशात सर्व घटकांच्या समतोल विकासासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री म्हणाले, भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना समाजातील शेवटच्या घटकाला विकासाच्या प्रवाहात आणण्याचा संकल्प प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
महात्मा गांधींच्या संकल्पनेतील भारतीय मूल्ये जोपासणारी शिक्षण पद्धती प्रत्यक्षात आणण्यासाठी नवीन शिक्षा नीती तयार करण्यात आली असून प्रादेशिक भाषेत सर्व प्रकारचे शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले. डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांच्या स्वातंत्र्य संग्रामातील योगदानाचा गौरव करताना आदिवासी, रामोशी, बेरड समाजातील स्वातंत्र्य सैनिकांचा इतिहास समोर आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे फडणवीस म्हणाले.