ठाणे : कळवा उड्डाणपुलावरुन श्रेयवादाची लढाई रंगणार का? | पुढारी

ठाणे : कळवा उड्डाणपुलावरुन श्रेयवादाची लढाई रंगणार का?

ठाणे, पुढारी वृत्तसेवा : मॉलमधील झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना झालेली अटक आणि सुटका यानंतर अनेक दिवस काम पूर्ण होऊन उदघाट्नच्या प्रतीक्षेत असलेल्या कळवा उड्डाणपुलाचे उद्घाटन रविवारी (दि.१२) होणार आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी ४ वाजता उदघाट्नचा कार्यक्रम होणार असून या उड्डाणपुलाची एक मार्गिका यावेळी वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे. हा पूल वाहतुकीसाठी लवकर खुला करण्यात यावा, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी दोन वेळा मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

आज आव्हाड यांनी या उड्डाणपुलाचा व्हिडीओ वायरल करून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे. आव्हाडांच्या मागणीनंतर या पुलाचे लोकार्पण होणार असून खारेगांव उड्डाणपुलाच्या उदघाट्नच्या वेळी रंगलेली श्रेयवादाची लढाई या पुलाच्या उदघाटनावेळी पहायला मिळणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कळव्याची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि एकाच उड्डाणपुलावरील भार कमी करण्यासाठी तिसरा नवीन उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. जून २०२२ पर्यंत पुलाच्या कामाची मुदत संपली तरी त्याचे काम पुर्ण झालेले नव्हते . आता या पुलाचे काम जवळपास पूर्ण झाले असून या पुलाची एक मार्गिका तरी सुरु करावी अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली होती.

मधल्या काळात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हा पुल खुला करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर नवरात्र उत्सवात हा पुल खुला केला जाईल असे आश्वासन त्यांना देण्यात आले होते . मात्र त्यावेळीही उदघाटनाचा दसऱ्याचाही मुहुर्त हुकला होता . त्यानंतर स्वतः जितेंद्र आव्हाड यांनी या उड्डाणपुलाची पाहणी करून किमान दिवाळीपर्यंत हा उड्डाणपूल खुला करावा अशी मागणी त्यांनी केली होती. स्वतः मुख्यमंत्र्यांनीच या पुलाचे उदघाटन करावे, अशी मागणी त्यांनी केली होती. यापूर्वी झालेल्या खारेगांव उड्डाणपुलाच्या उदघाटनावरून माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चांगलीच राजकीय फटकेबाजी पहायला मिळाली होती. यावेळी राष्ट्रवादी आणि तेव्हा शिवसेनेत असलेले कार्यकर्ते आमने-सामने आले होते.

हेही वाचलंत का?

Back to top button