[author title="संगमेश जेऊरे" image="http://"][/author]
सोलापूर : चातकाप्रमाणे वाट पाहणार्या शेतकर्यांसाठी यंदा मान्सूनने खुशखबर दिला असून, गतवर्षाच्या तुलनेत यंदा मान्सून सोलापुरात आठ दिवस आधीच दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकर्यांसह नागरिकांमध्ये उत्साह आहे.
यंदा आठ दिवस आधीच मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल झाला आहे. 31 मेपर्यंत केरळात दाखल होणार आहे. 2023 मध्ये सोलापुरसह पश्चिम महाराष्ट्रात मान्सून 24 जून रोजी दाखल झाला होता. यंदा 15 जूनच्या दरम्यान मान्सूनचा आगमन होऊ शकतो. गतवर्षी कलमी पावसामुळे सोलापुर जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यंदा नैऋत्य मोसमी वार्याच्या मॉन्सून हंगामातून जुन ते सप्टेंबर या कालावधीत यंदा 106 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारत हवामानशास्त्र विभागाने जाहीर केला. सध्या प्रशांत महासागरात असलेली एल -निनो स्थिती निवळू लागलेली आहे. मान्सून हंगामात ला-निना स्थिती तयार होण्याचे संकेत आहेत.
भारत हवामान विभागाने मॉन्सूनचे (नैर्ऋत्य मोसमी वार्याचे) आगमन यंदा केरळमध्ये एक दिवस अगोदर म्हणजे 31 मे रोजी दाखल होण्याचे संकेत दिले आहेत. मान्सूनचे आगमन चार दिवस मागेपुढे होण्याची शक्यता ही गृहीत धरण्यात आली आहे. सध्या अरबी समुद्रात येमेनच्या किनार्यालगत समुद्रसपाटीपासून 4.5 किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वार्याची स्थिती आहे. मध्य प्रदेश आणि परिसरावर 900 मीटर उंचीवर चक्राकार वार्याची स्थिती आहे. सोलापूर जिल्ह्यात पूर्व मौसमी पावसाला पोषक हवामान आहे. दरम्यान शेतकरी बंधूंनी मान्सूनचे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर व समाधानकारक पाऊस म्हणजे सलग तीन दिवस 75 ते 100 मिमीपेक्षा जास्त पाऊस तसेच मातीतील ओलावा अडीच ते तीन फूट पर्यंत या बाबी पेरणीसाठी निर्णायक आहेत, म्हणून पेरणी करताना या दोन्ही बाबींची खात्री करून खरीप मध्ये सोयाबीन, मूग, सूर्यफूल, भुईमूग, उडीद, तूर, बाजरी या पिकांच्या पेरण्या कराव्यात, असे आवाहन मोहोळ कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. तानाजी वळकुंदे यांनी केले आहेत.
सन 2019 मध्ये 22 जून रोजी सोलापूर जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले होते. तर 2020 मध्ये 11 रोजी तर 2021 मध्ये 8 जून रोजी मान्सूनचे आगमन झाले. 2022 आणि 2023 अनुक्रमे 15 जून, 24 जून रोजी आगमन झाला. गेल्या वर्षी उशिरा मान्सूनमुळे पेरण्या संकटात सापडल्या. यंदा वेळेवर मान्सून येण्याची शक्यता आहे.
– डॉ. सुरज सतीश मिसाळ,
विषय विशेषज्ञ जिल्हा कृषी हवामान केंद्र, मोहोळ