सातारा : शिवेंद्रराजे सांगतात ते आम्ही ऐकतो - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पाचगणी; पुढारी वृत्तसेवा : आ. शिवेंद्रराजेंनी सांगितले व आम्ही ऐकले नाही, असे कधी झालेच नाही. मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे आणि मी स्वत: जावली तालुक्यातील बोंडारवाडी धरणाचा प्रश्न लवकरच निकाली काढणार, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबई येथे आयोजित माथाडी कामगारांच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आ. शिवेंद्रराजे भोसले, माथाडी महामंडळाचे नूतन अध्यक्ष नरेंद्र पाटील, आ. शशिकांत शिंदे, माथाडी युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.
बोंडारवाडी धरण व्हावे म्हणून जावलीतील 54 गावांच्या नागरिकांनी गेल्या अनेक वर्षांपासून आवाज उठवला होता. धरण परिसरात जास्तीत जास्त माथाडी कामगार आहेत. हे धरण व्हावे म्हणून आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी माझ्याकडे वारंवार पाठपुरावा केला आहे, असेही ना. फडणवीस यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ. शिवेंद्रराजे यांच्या धरणाबाबतच्या मागणीला ग्रीन सिग्नल दिला. यावेळी मुख्यमंत्री ना. शिंदे, ना. फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला.