‘सांगली लोकसभा उमेदवारीचा विषय मार्गी लागणार, येत्या २४ तासात…’ : संजय राऊत यांचे संकेत | पुढारी

'सांगली लोकसभा उमेदवारीचा विषय मार्गी लागणार, येत्या २४ तासात...' : संजय राऊत यांचे संकेत

पलूस/कडेगाव; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सांगली दौऱ्यादरम्यान क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याला भेट दिली. तसेच वांगी तालुका कडेगाव येथी डॉ.पतंगराव कदम सोनहीरा सहकारी साखर कारखाना परिसरात डॉ.पतंगराव कदम यांच्या स्मृतीस्थळावरील समाधीचे दर्शन घेतले. या दोन्ही ठिकाणी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सांगली लोकसभा उमेदवारीबाबत भाष्य केले.

यावेळी बोलताना त्यांनी सांगली लोकसभेच्या उमेदवारीवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगलीतील लोकसभेची उमेदवारी चंद्रहार पाटील यांना दिली आहे. उमेदवारी सर्वांना विश्वासात घेऊनच दिली होती पण काही लोक वेगळी भूमिका घेत आहेत. परंतु येत्या २४ तासात सांगलीतील विषय मार्गी लागेल असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

 काही लोकांच्यामुळे सांगलीतील वातावरण ढवळले आहे

राऊत म्हणाले, सांगलीत आलो आणि बापूंच्या समधीचे दर्शन घेतले नाही असे शक्य नाही. आमदार लाड तत्वांना बांधील असल्याने त्यांनी महाविकास आघाडी सोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. सांगलीतील वातावरण ढवळले आहे ते काही लोकांच्यामुळे. या मतदार संघाचा पेच राहू नये यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

चंद्रहार पाटील या शेतकऱ्याच्या मुलाला मोठं करायचं आहे

चंद्रहार पाटील हा एका शेतकऱ्यांचा मुलगा आहे यांना बळ देणे आपलं कर्तव्य आहे. शिवसेनेने लहाणातील लहान माणसांना मोठं करायचं ठरवलं आहे कारण ज्या मोठ्या माणसांना मोठं केलं ती आम्हाला सोडून गेली असा टोला मुख्यमंत्र्यांना नाव न घेता लगावला. स्वातंत्र्य वाचवायचे असेल तर यंदा मोदींचा माणूस निवडून पाठवू न देता, मोदी यंदा 200 च्या आत लटकतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

2014 सलापासून देशात गोंधळच गोंधळ : आमदार अरुणअण्णा लाड

आमदार अरुणअण्णा लाड म्हणाले, 2014 सलापासून देशात यांनी गोंधळच गोंधळ घातला यात आपल्यातील काही गोंधळी जाऊन मिळालेत. त्यामुळे देशात गोंधळ वाढला आहे. पण गोंधळ घालणाऱ्यांबाबत जनता योग्य वेळी निर्णय घेईल. कोणालाही कितीही गोंधळ घालुदे आपण भाजपाने काय केलं, देशाची अधोगती कशी केली हे सर्वश्रुत आहे, आपल्यातील इंडिया आघाडी मोडीत काढणाऱ्यांनी एक व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आमदार जयंत पाटील यांनी बूथ कमिटीतून सांगितल्या प्रमाणे काम करून, आघाडी धर्म पळाला तर विरोधकांना चितपट करणे सोपं होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. मोहन पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या भेटीदरम्यान उपस्थित नेते

कुंडल (ता.पलूस) येथील क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्यावर भेटी दरम्यान राऊत बोलत होते. यावेळी आमदार अरुणअण्णा लाड, क्रांतीचे अध्यक्ष शरद लाड, जिल्हाध्यक्ष संजय विभूते, साजन सातपुते, पै.चंद्रहार पाटील, कुंडलिक एडके, मोहन पाटील, सुरेश शिंगटे यांच्यासह तालुक्यातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

कडेगाव डॉ.पतंगराव कदम यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन प्रसंगी उपस्थित नेते

वांगी तालुका कडेगाव येथे डॉ.पतंगराव कदम सोनहीरा सहकारी साखर कारखाना परिसरातील डॉ.पतंगराव कदम यांच्या स्मृतीस्थळी खासदार संजय राऊत यांनी समाधीचे दर्शन घेतले. यावेळी सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम उपस्थित होते. तसेच डबल महाराष्ट्र केसरी पै.चंद्रहार पाटील, हिंद केसरी संतोष वेताळ, सोनहीराचे संचालक पंढरीनाथ घाडगे, संजय विभूते आदी नेते उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button