Bhima River Accident | बुडालेल्या 'त्या' सहा लोकांचा पुन्हा शोध सुरू
इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यातील कळाशी गावात मंगळवारी (दि. २१) सायंकाळच्या सुमारास वादळात प्रवासी वाहतूक करणारी बोट बुडाली. ही बोट सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कुगाव येथून इंदापूर तालुक्यातील कळशीकडे प्रवाशांना घेऊन येत होती. यावेळी जोराचा वारा सुटल्याने ही बोट भीमा नदीपात्रात बुडाली गेली. या बोटीत जवळपास सात प्रवासी होते त्यापैकी एक प्रवासी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे हे पोहून पाण्यातून बाहेर आल्याने त्यांचा जीव वाचला, तर इतर सहा व्यक्तींचा मंगळवारपासून शोध सुरू आहे. अद्यापपर्यंत या सहा लोकांचा शोध लागलेला नाही. रात्री नऊ वाजताच्या सुमारास शोध कार्यात अडथळा येत असल्याने ही शोध मोहीम थांबवण्यात आली होती आता सकाळपासून ही शोध मोहीम पुन्हा सुरू झाली.
कळाशी गावच्या या भीमा नदीच्या पायथ्याशी एनडीआरएफचे पथक सकाळी दाखल झाले असुन त्यांची शोध मोहीम सुरू झाली आहे. जी माणसे बेपत्ता आहेत त्यामध्ये गोकूळ दत्तात्रय जाधव (वय ३०), कोमल गोकूळ जाधव (वय २५), शुभम गोकूळ जाधव (वय दीड), माही गोकूळ जाधव (वय ३, सर्व रा. झरे, ता. करमाळा, जि. सोलापूर), कुगाव येथील गोल्या उर्फ अनुराग अवघडे (वय २० ) व गौरव डोंगरे (वय २२) अशी बोट उलटून बुडाल्यांची नावे आहेत.
हेही वाचा