राज्यातील गड, किल्ल्यांचे करणार संवर्धन : मुरलीधर मोहोळ यांचे आश्वासन | पुढारी

राज्यातील गड, किल्ल्यांचे करणार संवर्धन : मुरलीधर मोहोळ यांचे आश्वासन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांच्या विचारांशी कधीही तडजोड केली जाणार नाही. तसेच राज्यातील गडकोट आणि दुर्गांच्या संवर्धनाचे काम कर्तव्य भावनेतून मी करीन, असे आश्वासन महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी दिले.
शहरातील सकल हिंदू समाजाच्या 27 हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने मोहोळ यांच्या समर्थनार्थ हिंदू जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री शंकर गायकर यांनी श्रीराम मंदिराचा संघर्ष मांडताना हिंदू म्हणून संघटित राहण्याचे आवाहन केले.

मोहोळ यांनी भाषणात नरेंद्र मोदी यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करताना पुण्याच्या संस्कृती रक्षणाची व विकासाची गॅरंटी पटवून दिली. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मान्यता मिळण्यासाठी भारत सरकारकडून श्रीशिवाजी महाराज यांच्या काळातील 12 किल्ल्यांचे नामांकन पाठवण्यात आले आहे. रायगडासह साल्हेर किल्ला, शिवनेरी किल्ला, लोहगड, खांदेरी किल्ला, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा किल्ला, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्यांचा त्यात समावेश आहे. या यादीतील बहुतांश किल्ले सह्याद्रीच्या परिसरातील आहेत.

सतराव्या ते एकोणीसाव्या शतकादरम्यान बांधलेल्या या किल्ल्यांच्या माध्यमातून मराठा राजवटीच्या सामरिक लष्करी शक्तीचे दर्शन होते. या आणि अशा अनेक किल्ल्यांच्या मदतीने श्रीशिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. या किल्ल्यांचे जतन, संवर्धनाचे काम मी कर्तव्य भावनेतून करीन, अशी ग्वाही मोहोळ यांनी दिली. मेळाव्यात किशोर चव्हाण, पराग ठाकुर, दीपक नागपुरे, स्वप्नील नाईक, लोकेश कोंढरे, संजय भोसले, किशोर येनपुरे, श्रीकांत शिळीमकर, अनिकेत हरपुडे यांनी मुरलीधर मोहोळ
यांना पाठिंबा जाहीर करून मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन महेश पवळे यांनी केले.

हेही वाचा

Back to top button