यंदाही ’चित्रबलाक’चे गोकूळ इंदापुरात : पक्षीप्रेमींना मोठी पर्वणी | पुढारी

यंदाही ’चित्रबलाक’चे गोकूळ इंदापुरात : पक्षीप्रेमींना मोठी पर्वणी

जावेद मुलाणी

इंदापूर : चित्रबलाक या कच्छच्या रणातील सैबेरियन पक्षांचे गोकूळ यंदाही इंदापूर येथे फुलणार आहे. सध्या चित्रबलाकच्या विणीचा हंगाम सुरू झाला आहे. हे सारंगगार पाहण्यासाठी राज्यभरातून पक्षी अभ्यासक इंदापूरला येऊ लागले आहेत. त्यामुळे आता इंदापूरची नवीन ओळख निर्माण झाली आहे. छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले यांची इंदापूर शहर कसब्यात ऐतिहासिक गढी आहे. गढीमध्ये सुफी संत चाँदशाहवली बाबा दर्गाह व तुरुंग आहे. येथील चिंचेच्या प्रत्येकी दोन झाडांवर गत 5 दशकापासून चित्रबलाक पक्षी आपले सारंगगार फुलविण्यासाठी येतात. मात्र, त्यातील एक मोठे झाड 16 जून 2023ला नगरपरिषद प्रशासनाने विनापरवाना पाडले.

त्यामध्ये या झाडावरील चित्रबलाकांसह शिकाट्या, वटवाघूळ, ग्रेहेरॉन हे शेकडो पक्षी मृत्युमुखी पडले. त्यांची हक्काची जागाच उद्ध्वस्त केल्याने यंदाच्या वर्षी पक्षी येणार का? असा प्रश्न पक्षीप्रेमींसह इंदापूरकरांना पडला होता. मात्र, हळूहळू या पक्षांनी पुन्हा गढीवरील उरलेल्या दोन झाडांवर कसेबसे आपले घरटे बांधण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीस 40च्या संख्येने आलेले चित्रबलाक आता जवळपास 100हून अधिक झाले आहेत. त्यांची घरटी बांधण्यासाठीची लगबग सुरू आहे.

घरट्यासाठी लागणार्‍या काड्या गोळा करण्यासाठी आकाशात त्यांच्या नयनमनोहर कवायती व हालचाली पक्षीप्रेमींना पर्वणी ठरत आहे. लवकरच या ठिकाणी त्यांचे गोकूळ फुलणार असून, त्याची उत्सुकता पक्षीप्रेमींसह स्थानिक नागरिकांनादेखील लागली आहे. शहराशेजारी उजनी धरणाचे विस्तीर्ण पाणलोट क्षेत्र असल्यामुळे त्यांना आवश्यक असलेले मासे, बेडूक, गोगलगाय, शेवाळ हे खाद्य सहज उपलब्ध होत आहे. त्यामुळे ते जानेवारीअखेरीस येतात.

शहराच्या वैभवात भर

इंदापूरमधील अनुकूल वातावरणामुळे गत 10 वर्षांपासून काही चित्रबलाक येथेच कायमस्वरूपी राहू लागले आहेत. त्यामुळे त्यांचा इंदापूरकरांना लळा लागला आहे. मुक्तछंदपणे उंच आकाशात घिरट्या घालत त्यांच्या कसरतीमुळे इंदापूर शहराच्या वैभवात भर पडली आहे. या आकाशविहाराच्या सुंदर कवायती पाहणे हा इंदापूरवासीयांचा नित्यक्रम झाला आहे.

गढीवरील चिंच व लिंबाची झाडे बनले माहेरघर

चित्रबलाकचा अधिवास जपण्यासाठी वीरश्री मालोजीराजे गढीवरील चिंचेची व लिंबाची झाडे जपणे गरजेचे आहे. येथील एक झाड पाडल्यानंतर आता उर्वरित तीन झाडांचे जतन व्हावे. याठिकाणी चिंचेची झाडे लावावीत, अशी मागणी पर्यावरणप्रेमी करत आहेत. चुकून एखादे पक्षाचे पिलू अथवा पक्षी खाली पडलेला आढळला.

हेही वाचा

Back to top button