पत्नीवर 37 वार करून तिला संपविणाऱ्याला अखेर जन्मठेप.. | पुढारी

पत्नीवर 37 वार करून तिला संपविणाऱ्याला अखेर जन्मठेप..

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दोन मुलांसह माहेरी राहणार्‍या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत कोयता आणि चाकूने तब्बल 37 वार करत खून करणार्‍या पतीला न्यायालयाने जन्मठेप आणि 15 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर यांनी हा निर्णय दिला. भालचंद्र गिराप्पा सुर्वे (वय 37, रा. आचेगाव, ता. दक्षिण सोलापूर) असे शिक्षा झालेल्या पतीचे नाव आहे. त्याला पत्नी अर्चना सुर्वे (वय 28) हिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरविले. अर्चनाचे वडील दत्ता बाबूराव बागडे (वय 54, रा. उरुळी देवाची) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

ही घटना 28 जुलै 2019 रोजी सकाळी अकराच्या सुमारास उरुळी देवाची येथील अशोकनगरमध्ये घडली. अर्चनाचे भालचंद्रसोबत 2008 मध्ये लग्न झाले. त्यांना दोन मुलेही झाली. परंतु, त्यांच्यामध्ये कायम भांडणे व्हायची. त्याला कंटाळून अर्चना दोन मुलांसह जानेवारी 2018 मध्ये उरुळी देवाची येथे पालकांकडे राहायला आली. ती एका कंपनीमध्ये ’हाउसकिपिंग’चे काम करायची. घटनेच्या दिवशी अर्चनाचे आई-वडील तिच्या दोन्ही मुलांसह चर्चमध्ये गेले होते.

अर्चना एकटीच घरी असताना भालचंद्र तिथे आला. भालचंद्रने अर्चनाच्या चेहरा, डोके व मानेवर चाकू व कोयत्याने 37 वार करून खून केला. सहायक निरीक्षक स्वप्निल लोखंडे यांनी तपास करून आरोपी भालचंद्र याचेविरोधात खुनासह शस्त्रास्त्र कायद्याच्या कलमांनुसार आरोपपत्र दाखल केले. आरोपीला कोणतीही दया न दाखविता कठोर शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी केला.

भाऊ, शेजार्‍याची साक्ष ठरली महत्त्वाची

अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी या खटल्यात सरकार पक्षाची बाजू मांडली. त्यांनी बारा साक्षीदार तपासले. आरोपी भालचंद्रला अर्चनाचा खून करताना पाहणारा तिचा भाऊ आणि शेजारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपीने वापरलेला चाकू व कोयता घटनास्थळी सापडला, तसेच त्याच्या कपड्यावर मृत महिलेचे रक्त सापडले. त्यामुळे कावेडिया यांनी जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली. निरीक्षक शशिकांत चव्हाण, हवालदार ललिता कानवडे आणि शिपाई माणिक गळाकाटे यांनी न्यायालयीन कामकाजात मदत केली.

हेही वाचा

Back to top button