पिंपरी : ‘शहरातील झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे उतारे द्यावेत’
पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी चिंचवड शहरात झोपडपट्टीची संख्या लक्षणीय आहे. काही ठिकाणी उकीरडा साफ करून त्या जागेवर झोपडपट्टी बसविण्यात आली आहे. या नागरिकांना मालकी हक्क उत्तारा देण्यात यावा, अशी मागणी भीम संग्राम सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल वडमारे यांनी केली आहे. झोपडपट्टी भागात अनेक लोकांनी पक्के बांधकाम करून घर बांधली आहेत व काही लोकांचे घर पत्र्याचे असल्यामुळे त्यांना जर घर दुरुस्त करायचे असेल तर त्यांना पिंपरी चिंचवड महापालिकेची परवानगी घ्यावी लागते.
ती परवानगी सहजासहजी मिळत नाही. त्यामुळे त्यांना जर झोपडीचा मालकी हक्क उतारा देण्यात आला. तर, त्यांना माता रमाई घरकुल योजनेचा लाभ घेता येईल. त्यामुळे झोपडपट्टी भागात राहणार्या नागरिकांना मालकी हक्काचा उत्तारा देण्यात आला. तर त्यांना एसआरए योजनेची गरज भासणार नाही व बैठे पुनर्वसन केल्यासारखे होईल,असे मागणीचे निवेदन भीम संग्राम सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल वडमारे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांना देण्यात आले आहे.
या वेळी महाराष्ट्र संपर्क प्रमुख आनंद साळवे, प्रदेश महासचिव कैलास परदेशी आदी उपस्थित होते.