कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन बालके जखमी; पाटस रस्त्यावर कुत्र्यांचा उच्छाद सुरूच | पुढारी

कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन बालके जखमी; पाटस रस्त्यावर कुत्र्यांचा उच्छाद सुरूच

बारामती; पुढारी वृत्तसेवा: भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर जनआंदोलनानंतरही परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. पाटस रस्त्यावर दोन लहानग्यांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला. त्यात दोघांनाही गंभीर जखमा झाल्या आहेत. शहरातील सर्वच भागात कुत्र्यांचा प्रश्न कायम असून, पालिकेकडून फक्त कार्यवाही सुरू आहे, असे उत्तर दिले जात आहे. गत आठवड्यात बारामती पालिकेसमोर नागरिकांनी आंदोलन करत पालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांना यासंबंधी निवेदन दिले. कुत्र्यांच्या नसबंदीसाठी आवश्यक ती निविदा प्रक्रिया राबवत असून लवकरच कार्यवाही होईल, असे रोकडे यांनी आश्वासन दिले. परंतु तत्काळ कार्यवाही अपेक्षित असताना ती होत नाही.

शहरातील सर्वच भागात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कमालीचा वाढला आहे. यामुळे लहान मुलांना खेळण्यासाठी घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. सकाळ-संध्याकाळ चालण्यासाठी, व्यायामासाठी ज्येष्ठांना बाहेर पडता येईनासे झाले आहे. कुत्र्यांची टोळी दहशत निर्माण करून अनेकांना चावे घेत आहे. कुत्रा चावल्यानंतर मोठ्या वैद्यकीय उपचाराच्या दिव्यातून नागरिकांना जावे लागते.

अनेकदा सरकारी रुग्णालयात रेबीजची लस उपलब्ध नसते. खासगी दवाखान्यात मोठी रक्कम मोजून उपचार घ्यावे लागतात. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न अत्यंत जटील झाला असताना पालिकेने यावर तत्काळ कार्यवाही करणे गरजेचे बनले आहे. परंतु बारामती पालिकेकडून सध्या या प्रश्नी टाळाटाळ केली जात असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. भार्गव पाटसकर यांनी व्यक्त केले.

Back to top button