टपाल विभागाच्या बँकेतूनही कर्ज | पुढारी

टपाल विभागाच्या बँकेतूनही कर्ज

शिवाजी शिंदे, पुणे : आता टपाल विभागाच्या बँकेमार्फतही सर्व प्रकारची कर्जे नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहेत. कमीत कमी कागदपत्रांमध्ये कर्ज कसे मिळेल, यावर भर देण्यात येणार आहे. देशातील शासकीय, सहकारी आणि खासगी बँकांमधून घरबांधणी, दुरुस्ती त्याचबरोबर उद्योग आणि व्यवसायासाठी कर्ज काढावयाचे म्हटले, तर गरजू नागरिकांना या बँकांचे अक्षरश: उंबरठे झिजवावे लागतात. आवश्यक असलेली कागदपत्रे देऊनसुद्धा कर्ज मंजूर होईलच याची कोणीही खात्री देऊ शकत नाही. देशासह राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना उद्योग, व्यवसाय, घरबांधणी, दुरुस्ती यासह विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणावर रकमेची गरज भासत असते.

त्यासाठी सामान्य नागरिक शासकीयसह खासगी, सहकारी बँकांकडे अर्ज करीत असतो. संबंधित बँकांमध्ये कार्यरत असलेले अधिकारी, अव्वल कारकून किंवा सहकारी बँकांमधील संचालक मंडळ यांचा मनमानी कारभार, देण्यात येत असलेली अपमानास्पद वागणूक याबरोबरच बँकांच्या नियमानुसार कागदपत्रांची पूर्तता केली तरी त्यामध्ये त्रुटी काढून कर्ज कसे नामंजूर होईल, यावर या बँकांचा भर असतो. त्यामुळे नागरिक अक्षरश: वैतागून जातो आणि तो नाईलाजाने फायनान्स किंवा सावकारी कर्ज घेण्यास प्रवृत्त होतो. अशा प्रकारच्या कर्ज देणार्‍या संस्थांचे फावते. नागरिकांच्या गरजेचा फायदा या संस्था घेत असतात. या संस्था मनमानी पद्धतीने व्याज दरांची आकारणी करत असल्याचे निदर्शनास आले आहे.

या बँकांची मनमानी लक्षात घेऊन टपाल विभागाच्या बँकेच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांसाठी वेगवेगळ्या कामांसाठी कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी कमीत कमी कागदपत्रे कशी लागतील, यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
ग्रामीण भागात गेल्या अनेक वर्षांपासून टपाल विभागाचे मोठ्या प्रमाणावर जाळे आहे. याचा फायदा टपाल विभागाच्या बँकांना होणार आहे. या बँकेचा कर्ज देण्याचा भर ग्रामीण भागात असणार आहे. संबंधित गावातील नागरिकांची त्या गावात कार्यरत असलेल्या पोस्टमनला माहिती असते. त्या-त्या नागरिकांची परिस्थिती काय आहे, याचीही माहिती असते. संबंधित नागरिकास कर्ज दिल्यास फेडू शकेल काय, याची माहिती असते. त्यामुळे या बँकेकडून ग्रामीण भागातील नागरिकांना कर्ज देण्यावर भर देण्यात येणार आहे.

Back to top button