राज्यात चार दिवस पावसाचे; उष्णतेची लाट परतणार : हवामानतज्ज्ञांनी ‘हा’ दिला इशारा | पुढारी

राज्यात चार दिवस पावसाचे; उष्णतेची लाट परतणार : हवामानतज्ज्ञांनी 'हा' दिला इशारा

पुणे : राज्यातील अवकाळी पाऊस कमी होत असून, सोमवार दि. 29 एप्रिलपर्यंत काही भागांत पाऊस पडेल. त्यानंतर पाऊस पूर्ण कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागासह ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिला. शुक्रवारी राज्यात जळगावचा पारा सर्वाधिक 42.7 अंशांवर गेला होता. मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात 27 व 28 एप्रिलपर्यंत ढगाळ वातावरणासह गारपिटीचा अंदाज आहे. मात्र, त्यानंतर राज्यातून अवकाळी पाऊस पूर्णतः कमी होत असून, 30 एप्रिलपासून कोरडे वातावरण राहील.

मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट

मुुंंबईसह कोकणातील 7 जिल्ह्यांत तसेच लगतच्या गुजरात राज्यात 27 ते 30 एप्रिलदरम्यान उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. उत्तर आणि मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या 10 जिल्ह्यांत पहाटेच्या किमान तापमानात सरासरीपेक्षा 5 अंशांनी वाढ होईल. त्यामुळे उकाडा वाढेल.

मान्सून अजून 40 ते 50 दिवस दूर

माणिकराव खुळे यांनी सांगतिले की, सध्या जरी हे वातावरण निवळत असले, तरी पूर्वमोसमी हंगामाला अजूनही 40 ते 50 दिवस बाकी आहेत. त्यामुळे अवकाळी पाऊस, उष्णतेची लाट व चक्रीवादळनिर्मिती यांसारख्या हंगामी वातावरणीय घटनांची शक्यता आहे.

अवकाळी व गारपिटीचे वातावरण 30 एप्रिलपासून निवळण्याची शक्यता आहे. वारा खंडितता प्रणाली सुस्पष्ट असून, मराठवाड्यावर एक चक्रीय वार्‍याची स्थितीही आहे. इराण, अफगाणिस्तान, दक्षिण पाकिस्तानातून गुजरातमार्गे महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात उष्ण वार्‍याचे वहन होत आहे.

– माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ

शेतकर्‍यांंसाठी माणिकराव खुळे यांचा सल्ला

रब्बीतील पिकांपैकी सध्या कांदे साठवणी, तर भरडधान्ये मशिनिंग, रासभरणी, वाळवणी स्थितीत खळ्यावर आहेत. त्यामुळे अशा शेतकर्‍यांनी सोमवारी 29 एप्रिलपर्यंत गाफील न राहता सावधानता बाळगून खळ्यावरील कामाचे नियोजन करावे.

हेही वाचा

Back to top button