अशोकनगर पुलाखाली पाणीच पाणी
ताथवडे : पुढारी वृत्तसेवा : मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अशोकनगर येथील पुलाखाली पाणी जमा झाले आहे. त्यामुळे चालकांना वाहन चालविताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिसरात जोरदार पाउस सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत.
त्यामुळे परिसरात वाहतूककोंडी होत आहे. पावसामुळे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. अशोकनगर पुलाखाली पाणी जमा झाल्यामुळे वाहनांच्या इंजिनमध्ये पाणी जावून अनेक वाहने बंद पडत होती. त्यामुळे पुलाखालील वाहतूक आणखी मंदावली होती. परिसरातील नागरिकांना दरवर्षी या समस्येला सामोरे जावे लागते. ही समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रार करुनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.