नाशिक : मार्केटमध्ये टोमॅटो झालाय 'सेलिब्रेटी'
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
टोमॅटोला कधी चढे दर मिळतात तर कधी कवडीमोल मिळाल्याने शेतकरी टोमॅटो अक्षरक्ष: रस्त्यावर फेकून देतात. पण सध्या भाजी बाजारात टोमॅटो सेलिब्रेटी असल्यासारखा भाव खातांना दिसतोय. टोमॅटोच्या भाववाढीमुळे खऱ्या आयुष्यात असणाऱ्या सेलिब्रिटींना टोमॅटो भाववाढीचा फटका बसलाय.
हॉटेल मालक असलेला अभिनेता सुनिल शेट्टी एका मुलाखतीत म्हणाला की, सेलिब्रिटी असलो म्हणून काय झाले महागाईचा फटका आम्हालाही बसतो. त्यामुळे हल्ली टोमॅटो खाणे कमी केले आहे. यावरून त्याला ट्रोलही केले गेले. प्रविण तरडे म्हणाले, दोन दिवस टोमॅटो महाग झालाय तर मिडीयात लईच आग लागलीये.. इथे वर्षभर भाव मिळत नाही म्हणून सडून जातो तेव्हा सगळे गप्पगार… या पोस्टचे शेतकऱ्यांनी समर्थन केले आहे. त्याचबरोबर टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवू की बँकेत?, टोमॅटो काय महाग करण्याची गोष्ट आहे का? आता टोमॅटोची चटणी कशी बनवणार? टोमॅटोची चटणी आणि सॅलेड कसं बनवणार? यासारखे अनेक मत मतांतर सोशल मिडियावर उमटत आहेत.
एका नामांकित फूड कंपनीने ७ जुलैला एक निवेदन जारी करत टोमॅटो खरेदीच्या अडचणींमुळे तात्पुरते टोमॅटो मेनूमधून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. हंगामी समस्यांमुळे मेनूमध्ये टोमॅटो समाविष्ट न करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून कंपनीला ट्रोल केले गेले. परंतु चांगल्या दर्जाचा माल मिळत नसल्याने कंपनीने तशी भूमिका घेतलेली आहे. थोडक्यात टाेमॅटो भाववाढीचा सर्वच मार्केटमध्ये परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
सद्या इतका भाव
सध्या बाजारात टोमॅटो १५० रूपये (भागानुसार किंमती वेगवेगळ्या) किलोने मिळत आहे. मुळात पावसाळ्यात भाजीपाल्याचा तुटवडा जाणवतो. त्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढलेले असतात. कधी कांदा भाव खातो तर आता टोमॅटो भाव खातोय पण मुळात ही भाववाढ तात्पुरत्या स्वरूपाची असते. कालातंराने किंमती स्थिरावतात.
हेही वाचा :