जळगावात बंद कंपनीच्या आवारात सुरक्षारक्षकाचा जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ | पुढारी

जळगावात बंद कंपनीच्या आवारात सुरक्षारक्षकाचा जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ

जळगाव : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या जवळच असलेल्या एका बंद कंपनीच्या आवारात सुरक्षारक्षकाचा जळून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. १९) सकाळी ८.३० वाजता उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत पाहणी केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील रामनगर येथील रहिवासी ईश्वर देवराम अहिरे (वय-६६) हे सुरक्षारक्षक म्हणून काम करून आपल्या परिवाराच उदरनिर्वाह करतात. एमआयडीसी पोलीस ठाण्याजवळ समोरील बाजूस विक्रम प्लास्टिक ही बंद पडलेली कंपनी आहे. गुरुवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह आणि वाळलेले गवत जळताना दिसून आले. सुरक्षारक्षक म्हणून रात्री काम करून परतलेले काशिनाथ मराठे यांनी गेट उघडताच त्यांनी हे दृष्य पाहताच त्यांना धक्काच बसला. याबाबत त्यांनी लागलीच वरिष्ठांना माहिती देत त्यांनी एमआयडीसी पोलिसांना कळविले.

नेमका प्रकार आहे काय?

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. एमआयडीसी पोलिसात शुभम लालसिंग ठाकूर (वय-३०) यांनी खबर दिली आहे. अहिरे यांचा घातपात झाला की त्यांनी आपले जीवन संपविले अशा आशयाने तपास सुरू आहे. याप्रसंगी फॉरेन्सिक लॅबचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून चौकशीला सुरुवात केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अहिरे यांना दारूचे व्यसन होते. रात्री थंडी असल्याने त्यांनी शेकोटी केली असावी आणि त्यात तोल जावून त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज असल्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button