नाशिक : सावतावाडीत बिबट्याची दहशत; 25 जनावरांचा फडशा
नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा
वटार येथील सावतावाडी वस्तीत बिबट्याने वर्षभरापासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून, दररोज शेतकर्यांच्या दुभत्या जनावरांना लक्ष करत आहे. शनिवारी (दि. 5) सायंकाळी वटार शिवारातील शाळेच्या पाणंद रस्तावर रात्री आठच्या सुमारास भक्ष्याच्या शोधातील बिबट्याने राजेंद्र श्रावण बागूल यांच्यावर जब्बर हल्ला चढविला. पंजाचा मारा बसल्याने ते खाली पडले, तेवढ्यात अशोक बागूल त्याच रस्त्याने जात होते. त्यांनी बिबट्याने कुणावर तरी हल्ला केल्याचे निदर्शनास आले असता त्यांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने अंधारात पळ काढला. रात्रीतून शेतात पिकांना पाणी देणार्या दोघा-तिघा शेतकर्यांना बिबट्याने दर्शन दिल्याने दहशत कायम राहिली आहे.
गेल्या एक वर्षापूर्वी बिबट्याने कार्तिकबापू बागूल या बालकांवर जबर हल्ला केला होता. सुदैवाने त्याचे प्राण वाचले, नंतर काळू दशरथ महारणर हा मेंढपाळ तरुणही हल्ल्यातून बचावला होता. सहा महिन्यांपूर्वी वृद्ध महिलेवर हल्ला चढवला होता. प्रसंगावधानाने महिलेचे प्राण वाचले. आठ महिन्यांपूर्वी रमण नारायण खैरणार या तरुण शेतकर्यालाही बिबट्याच्या हल्ल्याला सामोरे जावे लागले होते. परिसरात बिबट्याने उच्छाद मांडला असून, दररोजच सायंकाळपासून कोणत्या ना कोणत्या शेतकर्याला बिबट्या दर्शन घडते. आता पुन्हा बिबट्याने हल्ला चढविल्याने ग्रामस्थ भयभीत झाले असून, पशुधन धोक्यात आले आहे. विशेषत: मेंढपाळ धास्तावले आहेत. गेल्या बारा महिन्यांत बिबट्याने सहा ते सात वेळा हल्ले करून 20 ते 25 जनावरांंचा जीव घेतला आहे. अनेक दिवसांपूर्वी सावतावाडी शिवारात बिबट्याचा वावर आहे. वनपाल उडवाउडवीचे उत्तर देऊन आपली जबाबदारी झटकतात. सावतावाडी परिसरात दोन-तीन शेतकर्यांना मुक्त दर्शनही दिले आहे. दरवर्षी बिबट्या येतो अन् पाळीव प्राण्यांवर ताव मारतो. शिवारात मोठी काटेरी झुडपे आहे. त्याचा बिबट्याला फायदा होतो. मेंढपाळ तर दरवर्षी जेरीस आले असून, दरवर्षी 10 ते 12 मेंढ्यांचा बळी जात आहे. परिणामी, शेतकरी, पशुपालकांना रात्र जागूनच काढावी लागते.
सायंकाळच्या सुमारास घराकडे जात असताना बिबट्याने माझ्यावर हल्ला केला. अचानक पंजाचा फटका बसल्याने मी खाली पडलो. आरडाओरड केली. त्यामुळे बिबट्याने पळ काढला. घनदाट झाडीत लपायला भरपूर जागा असल्याने बिबट्याला नैसर्गिक अधिवास मिळाला आहे. रात्री शेतीला पाणी देत असताना बिबट्याचे दर्शन घडते. दिवसा सुरळीत वीज मिळत नसल्याने रात्री शेतात जाण्याशिवाय पर्याय नाही. आज माझ्यावर हे संकट आले, उद्या कोणावरही येऊ शकते. ते टाळण्यासाठी वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात. – राजेंद्र बागूल, जखमी शेतकरी, वटार