नाशिक: डाळींना महागाईचा तडका; प्रतिकिलो ११५ ते १३५ रुपये भाव | पुढारी

नाशिक: डाळींना महागाईचा तडका; प्रतिकिलो ११५ ते १३५ रुपये भाव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अगोदरच महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना आणखी मोठा झटका बसला आहे. भाजीपाल्याबरोबरच आता कडधान्यही महागल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. रक्षाबंधनापासून सणासुदीला सुरुवात झाली आहे. मात्र, याच काळात तूरडाळ महागल्याने, उत्सवाच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे. घाऊक बाजारात तूरडाळीचे दर ११५ रुपये किलो आहेत, तर किरकोळ बाजारात तूरडाळीचे दर प्रतिकिलो १२५ ते १३५ रुपयांवर गेले आहेत.

अतिवृष्टीमुळे अनेक भागांमधील पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आले आहेत. अशात कडधान्यांकडे जोर वाढला आहे. मात्र, आता कडधान्यांचे दरही वाढविण्यात आल्याने, खावे तरी काय, असा प्रश्न सामान्यांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, तूरडाळीबरोबरच मूगडाळीचे दरदेखील वाढविण्यात आले आहेत. मूगडाळ ठोक बाजारात ९० ते १०० रुपये प्रतिकिलो याप्रमाणे मिळते. तर किरकोळ बाजारात हेच दर ११५ ते १२० रुपयांवर गेले आहेत. गेल्या वर्षी तुरीला बाजारात अपेक्षित भाव न मिळाल्याने, अनेक शेतकऱ्यांनी तुरीऐवजी सोयाबीनला पसंती दिली. त्यामुळे पुढच्या काळात बाजारात तुरीचा पुरवठा कशा पद्धतीने केला जाणार यावर तुरीचे दर ठरविले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, तुरीसह इतर डाळींचे दर वाढविल्याने, ऐन सणासुदीत ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने दर कमी केल्याने, महागाई कमी होईल, असे अपेक्षित आहे. मात्र अद्यापपर्यंत वाढलेले कोणतेच दर कमी केले नसल्याने, कडधान्यांचे दर कमी करण्याबाबत सरकार लक्ष देईल काय, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा:

Back to top button