Nashik : राजकीय व आर्थिक साक्षरतेची गरज : आमदार सत्यजित तांबे
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
साहित्यिकाला विचार करावा लागतो. वैचारिक निर्मिती दोनदा येते एकदा मनात आणि प्रत्यक्षात. भारत साक्षरेतेकडे वाटचाल करत असला तरी आता राजकीय आणि आर्थिक साक्षरतेची गरज महत्वाची असल्याचा विचार नवनिर्वाचित आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केला.
सार्वजनिक वाचनालयाचा युवा साहित्यिक महोत्सवात बक्षिस वितरण प्रसंगी ते मु. श औरंगाबादकर सभागृहात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वैद्य विक्रांत जाधव, डाॅ. धर्माजी बोडके, संजय करंजकर, अॅड. अभिजित बगदे उपस्थित हाेते. तांबे म्हणाले, सोशल मिडियामुळे अनेक साहित्यिक तयार झाले. पूर्वी लेखकाला प्रसिध्दीसाठी पुस्तक, वर्तमानपत्राची वाट बघावी लागायची. पण आता सोशल मिडियामुळे एकावेळी विचार अनेकांपर्यंत पोहचवता येते. सोशल मिडिया होतकरू लेखकांसाठी व्यासपीठ असल्याचे ते म्हणाले. प्रसंगी वाचक चळवळ वृध्दींगत करणाऱ्या भीमाबाई जोंधळे यांचा आ. सत्यजीत तांबे यांच्या हस्तेे सत्कार करण्यात आला.
साहित्यिक डॉ. जगन्नाथ पाटील म्हणाले, काय वाचावे, लिहावे, एेकावे याबाबत तरूणपिढी कुपोषित झाली असून विवेक गमावून बसली आहे. व्हॉटस अॅप सोशल मिडियाच्या माध्यमातून येणारे साहित्य भग्नावस्थेत आहे. दहावीतर्यंत युवा पिढीची साहित्याशी संबध येतो त्यानंतर साहित्याशी त्यांची फारकत होते. स्वागत प्रास्ताविक संजय करंजकर यांनी केले.
हेही वाचा :