Nashik : मालेगावपाठोपाठ आता इगतपुरीतील रस्ता चोरीला | पुढारी

Nashik : मालेगावपाठोपाठ आता इगतपुरीतील रस्ता चोरीला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गेल्या आठवड्यात मालेगाव तालुक्यातील टोकडे गावचा रस्ता चोरीला गेल्याच्या तक्रारीबाबत कार्यकारी अभियंता संजय नारखेडे यांनी अहवाल सादर केला होता. आता इगतपुरी तालुक्यातील कुऱ्हेगाव येथील रस्ता चोरी झाला असल्याची तक्रार सरपंच संगीता भाऊसाहेब धोंगडे यांनी केली आहे. त्यामुळे बांधकाम विभागावर पुन्हा रस्ता शोधून देण्याची नामुष्की येणार आहे. याबाबतच्या तक्रारीची प्रत ग्रामविकासमंत्री, जिल्हाधिकारी, वाडीवऱ्हे पोलिस ठाणे यांना सरपंच धोंगडे यांनी पाठविली आहे. हा रस्ता शोधून न दिल्यास उपोषण करण्याचा इशारा सरपंच धोंगडे यांनी दिला आहे.

शासकीय निधीतून होणारा खर्च हा जनतेसाठी खर्च व्हावा, हा निधी कोणाच्याही खिशात जाऊ देणार नाही. या प्रकरणी सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी, संबंधित व्यक्तींकडून वसुली व्हावी, रस्ता शोधून देण्याची अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब धोंगडे यांनी केली आहे. दिलेल्या तक्रारीमध्ये नमूद केले आहे की, कुऱ्हेगाव येथे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी गावकऱ्यांच्या मागणीला प्रतिसाद देऊन काशाबाई मंदिर ते हनुमान मंदिर हा १० लाखांचा रस्ता काँक्रिटीकरण काम मंजूर केले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेकडून अंदाजपत्रक, तांत्रिक मान्यता, कार्यारंभ आदेशही देण्यात आले होते. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून या कामाची वाट गावकरी पाहात आहेत. संबंधित विभागाकडे चौकशी केली असता, रस्ता गावातून गायब झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सरपंच संगीता भाऊसाहेब धोंगडे यांनी संबंधित विभागाकडे तक्रार केली आहे. या प्रकरणी कुऱ्हेगाव येथे चांगलीच चर्चा रंगली असून, हा रस्ता नेमका गेला कुठे याची चर्चा सुरू आहे. हा रस्ता शोधून देण्याची मागणी सरपंच धोंगडे यांनी केली आहे.

हेही वाचा : 

Back to top button