पत्नीसोबत असलेल्या प्रेमसंबंधातून बालमित्राची हत्या | पुढारी

पत्नीसोबत असलेल्या प्रेमसंबंधातून बालमित्राची हत्या

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : पत्नीसोबत असलेल्या प्रेमसंबंधामुळे रागाच्या भरात कोयत्याने वार करुन एका माथेफिरुने त्याच्या बालपणीच्या मित्राची हत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी वरळीमध्ये घडली. विनोद साळुंके (वय ३७) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर गिरीष जाधव (वय ३७) असे संशयित आरोपीचे नाव असून हत्येनंतर त्याने पोलीस ठाण्यात हजर होत हत्येची कबुली दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वरळी बीडीडी चाळ ०५ च्या समोरील फुटपाथवर मंगळवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली. यात जाधव याने बालपणीचा मित्र विनोद साळुंके याच्या डोक्यात कोयता घातला. त्यानंतर त्याने वरळी पोलीस ठाणे गाठून हत्येची कबुली दिली. या घटनेने पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी अवस्थेतील साळुंके याला तात्काळ उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची नोंद करुन वरळी पोलिसांनी साळुंकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर साळुंके याच्या नातेवाईकाची फिर्याद नोंदवून घेत याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

जाधव याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, साळुंके याचे आपल्या पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याचे त्याला समजले. त्याने या दोघांवर पाळत ठेवली. संशय खरा ठरल्यानंतर त्याने मंगळवारी सायंकाळी साळुंके याला बीडीडी चाळीच्या समोरील फूटपाथवर गाठून त्याची हत्या केली.

हेही वाचा : 

Back to top button