धाराशिव : लग्नाहून परतत असताना ट्रॅव्हल्स घाटात धडकली १३ जण जखमी | पुढारी

धाराशिव : लग्नाहून परतत असताना ट्रॅव्हल्स घाटात धडकली १३ जण जखमी

भूम, पुढारी वृत्तसेवा : लातूरहून विवाह कार्य आटपून भूमकडे येणाऱ्या ट्रॅव्हल्सला पारडीच्या समोरील डाव्या बाजूचे टायर फुटल्याने घाटामध्ये अपघात झाला. यामध्ये १३ जण जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि. २२) रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. ट्रॅव्हल्सच्या चालकाच्या प्रसंगावधानामुळे ट्रॅव्हल्स मधील सर्व प्रवासी सुदैवाने बचावले.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुम तालुक्यातील गोरमाळा येथील अवताडे परिवारातील विवाह लातूर येथे होता. हा विवाह सोहळा आटपून न्यू जय मल्हार ट्रॅव्हल्स मधून वऱ्हाडी मंडळी भूमकडे येत होती. ही ट्रॅव्हल्स पारडी घाटामध्ये आली असता एका धोक्याच्या वळणावर गाडीचे टायर फुटले. टायर फुटल्याने ड्रायव्हरच्या समोर मोठे संकट होते. समोर दोनशे ते अडीचशे फूट खोल दरी होती आणि सोबत प्रवासी होते . या चालकाने प्रसंगावधान राखून गाडी धोक्याच्या वळणावरून घाटाच्या पायथ्याशी आणली व तेथील एका बाजूला घेतली त्यामुळे ती गाडी तेथील डोंगराला धडकली . यामध्ये गाडीतील १३ प्रवासी जखमी झाले काही किरकोळ जखमी झाले काहींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले तर जास्तीचा मार लागलेल्या तीन ते चार जणांना पुढील उपचारासाठी उस्मानाबाद येथे दाखल करण्यात आले.

या अपघातामध्ये महेश आवताडे विठ्ठल ढगे बबन अवताडे सिंधू अवताडे किसनाबाई अवताडे विजय माला गरड विठ्ठल अवताडे भगवान अवताडे बेगम शेख श्रीमंत अवताडे मच्छिंद्र गाढवे यशराज पाटील हे जखमी झाले. हा अपघात जरी झाला असला तरी विवाह सोहळा असणाऱ्या अवताडे यांनी चालकाने प्रसंगावधान राखून मोठा अनर्थ टाळल्याने त्याचे आभार मानले . याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू होती. जखमींना ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी आणल्यानंतर त्या ठिकाणी गैरसोय झाल्याने नातेवाईक व वैद्यकीय अधिकारी यांची शाब्दिक चकमक ही उडाली.

हेही वाचंलत का?

Back to top button