औरंगाबाद : नाथसागर धरणातून पहिल्यांदाच ९९ हजार क्युसेक विसर्ग सुरू | पुढारी

औरंगाबाद : नाथसागर धरणातून पहिल्यांदाच ९९ हजार क्युसेक विसर्ग सुरू

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण येथील नाथसागर धरणामध्ये वरील धरणातून येणाऱ्या पाण्याची आवक शनिवारी (दि. १७) दुपारी ८७ हजार ८२७ क्युसेक इतकी होती. त्यामुळे यावर्षी प्रथमच उघडलेल्या २७ दरवाजातून गोदावरी नदीत ९९ हजार ५३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर ९ आपत्कालीन दरवाजे अडीच फुटांनी खुले केले असून इतर दरवाजे ४ फुटांनी खुले केले आहेत, अशी माहिती धरण नियंत्रण शाखा अधिकारी विजय काकडे यांनी दिली.

नाथसागर धरणातून यावर्षी प्रथमच गोदावरी नदीत मोठा विसर्ग सोडण्यात आला आहे. तहसीलदार शंकर लाड यांनी गोदावरी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आपेगाव, वडवळी, पाटेगाव, नवगाव, हिरडपुरी, आवडे उंचेगाव, टाकळी अंबड येथील महसूल विभागाचे तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांनी नागरिकांना नदीच्या पाण्यात व परिसरात जाण्यास प्रतिबंधक करावे अशा सूचना दिले आहेत.

तर, शहरातील गोदावरी नदी काठी दशक्रिया विधीसाठी येणाऱ्या नागरिकांनी पाण्यात उतरू नाही, असे आवाहन नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष आगळे यांनी केले आहे. नदी घाटावर नियंत्रण पथकासह पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती पैठण विभागाचे डीवायएसपी डॉ. विशाल नेहुल यांनी ‘दैनिक पुढारी’ शी बोलताना दिली.

दरम्यान, शनिवारी दुपारपर्यंत नाथसागर धरणामध्ये एकूण २८६२ .४७१ दलघमी पाणीसाठा झाला असून धरण ९९ टक्के भरले आहे. तर उजव्या कालव्यातून ५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. धरणाच्या वरील भागात असाच पावसाचा जोर कायम राहिल्यास सायंकाळी पाण्याच विसर्ग १ लाखाहून अधिक क्युसेक सोडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाच्या धरण नियंत्रण विभागाच्या कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button