परभणी : मंगरूळ तांडा येथे आगीत सहा घरे जळून खाक तर शेळ्यांचा मृत्यू | पुढारी

परभणी : मंगरूळ तांडा येथे आगीत सहा घरे जळून खाक तर शेळ्यांचा मृत्यू

जिंतूर (जि.परभणी), पुढारी वृत्‍तसेवा : जिंतुर तालुक्यातील कौसडी येथून जवळ असलेल्या मंगरूळ तांडा येथे आगीत सहा घरे जळून खाक झाल्याची घटना आज सकाळी घडली. या आगीमध्ये जवळपास सहा घरातील संसारोपयोगी वस्तू आणि शेळ्यांचा मृत्यू झाला आहे.

ही आग कशामुळे लागली याच नेमकं कारण कळाले नाही. मंगरूळ तांडा येथे आगीच्या घटनेमध्ये गोविंद रामदास आडे, विजय गोविंद आडे, राजू गोविंद आडे भुजंग बाबुराव चव्हाण, गजानन भुजंग चव्हाण, शेषेराव शिवाजी राठोड यांच्या घराला अचानक आग लागली होती. या आगीने बघता बघता घराच्या चारी बाजूने पेट घेतला. घरामधील गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ तसेच शेळींचे पिल्ले व जवळपास 20 हजार रुपयांसह संसारोपयोगी वस्तू पूर्णपणे जळून खाक झाले.

तसेच, अंदाजे या सहा कुटुंबाचा जवळपास नऊ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मंगरूळ तांडा येथील महिला व नागरिकांनी आजूबाजूच्या विहिरीतून व घरातील पाण्याच्या टाकीतून पाणी आणून आग विझवून आटोक्यात आणली. या घटनेची माहिती जिंतूरचे तहसीलदार तसेच पोलीस प्रशासनाला देण्यात आली महसूल विभागातील तलाठी यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.

या सहा घरांना आग लागून पूर्णपणे जळून खाक झाल्याने सर्व कुटुंब उघड्यावर आले आहेत. प्रशासनाने तातडीने मदत करण्याची गरज आहे. असे या कुटुंबातील सदस्‍यांनी सांगितले.

हे ही वाचा  

Back to top button