कोल्हापूर : मृत्यूवेळीही भावांचा दोस्ताना कायम; पाठोपाठ घेतला जगाचा निरोप | पुढारी

कोल्हापूर : मृत्यूवेळीही भावांचा दोस्ताना कायम; पाठोपाठ घेतला जगाचा निरोप

कौलव; पुढारी वृत्तसेवा : अतिशय खडतर परिस्थितीतून कुटुंब सांभाळत आजच्या कलियुगातही बंधुप्रेमाचे एक आदर्श उदाहरण ठरलेले ठिकपुर्ली (ता. राधानगरी) येथील विलास बाबुराव भंडारी (वय 81) व जयसिंग बाबुराव भंडारी (63) या दोन सख्ख्या भावांनी केवळ पाच मिनिटांच्या अंतराने जगाचा निरोप घेताना बंधुप्रेम सांभाळल्याची घटना घडली.

ठिकपुर्ली येथील विलास, जयसिंग, मुरलीधर व प्रल्हाद या चार बंधूंनी अत्यंत गरिबीच्या परिस्थितीशी झुंजत कापड व्यवसायात जम बसवला होता. व्यवसाय सांभाळत असताना त्यांनी एकत्र कुटुंबाची नाळ कधीही तुटू दिली नव्हती. चौघा भावांचा दोस्ताना व जिव्हाळा हा परिसरात चर्चेचा विषय असायचा. चौघेही भाऊ अगदी मित्रासारखे एकमेकांशी नाते ठेवून होते. अगदी प्रत्येक बाबतीत ते एकमेकाला विसंबून असत.

शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास यापैकी जयसिंग यांचे आकस्मिक निधन झाले. त्याचा धक्का बसून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतराने थोरले बंधू विलास यांना दुःखावेग सहन झाला नाही व त्यांनीही जगाचा निरोप घेतला. अगदी जन्मभर एकमेकांशी बंधुप्रेमाचा जिव्हाळा सांभाळत कुटुंब एकत्र राखलेल्या दोन भावांनी एकाच वेळी जगाचा निरोप घेतला.

Back to top button