‘गोकुळ’मधून ती प्रवृत्ती हटवली : आ. सतेज पाटील
कोल्हापूर: पुढारी वृत्तसेवा : गोकुळमधील प्रवृत्ती विरोधात स्वाभिमानी दुग्ध उत्पादक मतदारांनी निवडणूक लढवली. ती प्रवृती हटवण्यासाठी आमच्या पॅनेलला निवडून दिले. यामुळे राज्यात झालेल्या सत्तातंराचा गोकुळवर काही परिणाम होणार नाही असे आमदार सतेज पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या सरकारला जनतेची सहानभूती नाही, यामुळेच निवडणूका पुढे ढकलल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
खा. धनंजय महाडिक यांनी गोकुळ, जिल्हा बँकेत सत्तातंराचे परिणाम दिसतील, या वक्तव्याचा सतेज पाटील यांनी समाचार घेतला.एका प्रवृत्तीच्या विरोधातच गोकुळची निवडणूक होती. यामुळे सत्तातंरामुळे काही घडेल असे कोणाला वाटत असेल तर तसे काहीच होणार नाही. सत्ता असो वा नसो आम्ही लोकांची कामे करत त्यांच्यासोबत असतो. यामुळे या सत्तातंरामुळे काही फरक पडणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
निवडणूका पाच वर्षांतून व्हायला हव्यात मात्र, 2011 पासून राज्यात जनगणना झालेली नाही. यामुळे काही लोकसंख्या गृहीत धरून मतदार संघ रचना केली होती. सर्वोच्च न्यायालयानेही निवडणूक घेण्याबाबत आयोगाला सांगितले आहे. मात्र, या सरकारविषयी जनतेत सहानभूती राहीलेली नाही. यामुळे निवडणूका घेतल्यास अचडणीचे होईल, यामुळेच विविध कारणांनी ते निवडणूका पुढे ढकलत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला. अद्याप मंत्रीमंडळ स्थापन होत नाही, सध्याच्या मंत्रिमंडळाला जनता कंटाळली आहे. यामुळे आठ तारखेपर्यंत मंत्रिमंडळ स्थापन न झाल्यास मोर्चाच काढावा लागेल असेहीते म्हणाले.
घरच्या कामासाठी निधी होता का?
राज्य शासनाने विकास कामांचा निधी थांबवला. यामध्ये राजर्षी शाहूंच्या समाधीस्थळाचाही निधी आहे. हा घरच्या कामकासाठी निधी होता का, असा सवाल करत राजर्षी शाहूंच्या समाधीस्थळासाठीचा हा निधी होता,असे सांगत हा निधी तत्काळ द्यावा याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टमंडळाद्वारे भेट घेतल्याचेही आ. पाटील यांनी सांगितले.