राजीव गांधी जंयतीनिमित्त कोल्हापुरात शुक्रवारी शेतकरी मेळावा | पुढारी

राजीव गांधी जंयतीनिमित्त कोल्हापुरात शुक्रवारी शेतकरी मेळावा

कोल्हापूर पुढारी वृत्तसेवा : भारताचे माजी पंतप्रधान राजीवजी गांधी यांच्या 77 व्या जयंतीनिमित्ताने आमदार पी. एन. पाटील-सडोलीकर यांनी शुक्रवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. हा मेळावा श्री शाहू शिक्षण संस्थेच्या आवारात यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे. गेली 28 वर्षे सातत्याने सद्भावना दौड व शेतकरी मेळाव्याचे आयोजन होत असून, या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सदभावना दौड रद्द करण्यात आली आहे. यावर्षी श्री श्री शाहू छत्रपती महाराज यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम संपन्न होत आहे.

काँग्रेस पक्षाची ध्येय, धोरणे, विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने राजीवजी गांधी यांच्या जन्मदिवशी दौड व शेतकरी मेळाव्याचे आयोजन होत असते. या निमित्ताने राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची भविष्यकालीन वाटचाल कशी असावी या संदर्भाने अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत विचारविमर्श होत असतो.

गेल्या 27 वर्षांमध्ये राष्ट्रीय तसेच राज्यस्तरावरील अनेक काँग्रेसच्या नेत्यांनी या दौडीसाठी आपली उपस्थिती लावली आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री सर्वश्री विलासरावजी देशमुख, पृथ्वीराजजी चव्हाण, अशोकरावजी चव्हाण, माजी मंत्री पतंगरावजी कदम, मंत्री बाळासाहेब थोरात आदी मान्यवरांचा समावेश आहे.

शुक्रवारी होत असलेल्या राजीवजी गांधी यांच्या जयंती कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळात कामगार मंत्री असणारे हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ सभापती सौ. रसिका अमर पाटील यांचा सत्कार श्री शाहू छत्रपती महाराज यांच्याहस्ते संपन्न होणार आहे.

या समारंभास कोल्हापूर शहर तसेच करवीर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार पी. एन. पाटील-सडोलीकर यांनी केले आहे.

हे ही वाचलत का :

Back to top button