नारायण राणे यांच्या निवासस्थानी केसरकर! | पुढारी

नारायण राणे यांच्या निवासस्थानी केसरकर!

कणकवली, पुढारी वृत्तसेवा : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची त्यांच्या कणकवलीतील ओम गणेश निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. राजकीय संघर्षाच्या जवळपास एक तपानंतर मंत्री केसरकर यांनी राणे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात त्याविषयी तर्कवितर्क सुरू झाले. मात्र, नंतर या दोन्ही नेत्यांनी या भेटीबाबत स्पष्टीकरण देताना आमच्यात वैयक्तिक मतभेद, संघर्ष कधीच नव्हता, असे स्पष्ट करत जिल्ह्यातील डी.एड. बेरोजगारांच्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी ही भेट होती, असे सांगितले. (Narayan Rane)

मंत्री केसरकर यांनी ना.राणेंबद्दल आपल्या मनात पूर्वी जसा आदर होता तसा तो आजही आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी काही नवीन करता येईल का? यासाठी लवकरच एकत्र बसून चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी वर्ष-दोन वर्षापासून दीपक केसरकर आणि राणेंमध्ये राजकीय दुरावा निर्माण झाला होता. त्याचे पडसाद 2014 च्या लोकसभा निवडणुकीत उमटले होते. त्यानंतर केसरकरांनी शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यानच्या काळात जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलून गेली. केसरकर हे 2014 मध्ये तत्कालीन भाजप-शिवसेनेच्या काळात राज्यमंत्री झाले आणि राणे व त्यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला गेला. आता केसरकर हे उध्दव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात आहेत. राज्यात भाजप आणि शिंदे गट शिवसेनेचे महायुती सरकार आहे. ते सध्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आहेत. जवळपास एक तपानंतर मंत्री केसरकर हे सोमवारी राणेंच्या भेटीला कणकवलीतील त्यांच्या निवासस्थानी आले आणि सर्वांच्याच राजकीय भुवया उंचावल्या.  (Narayan Rane)

सोमवारी सकाळी 10.45 वा. मंत्री केसरकरांचे ओम गणेश निवासस्थानी आगमन झाले आणि राणे व केसरकर यांच्यात सुमारे अर्धा तास चर्चा झाली. नंतर त्या दोघांनीही बाहेर येवून पत्रकारांशी संवाद साधला. दोघांनाही पत्रकारांनी त्यांच्यातील राजकीय संघर्षाबाबत विचारणा केली असता दोघांनीही आपल्यात मतभेद, संघर्ष नसल्याचे स्पष्ट केले. डी.एड. बेरोजगार आणि जिल्ह्याच्या विकासाबाबत ही भेट असल्याचे सांगितले. केंद्रीय मंत्री राणेंना याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता, केसरकर-राणे असा वैयक्तिक संघर्ष कधीच नव्हता. राजकीय संघर्ष असला तरी तो एखाद्या विषयापुरता असेल. जिल्ह्यातील एखादे विकासाचे काम होण्यासाठी वेगवेगळे राजकीय पक्ष म्हणून त्यावेळी वैचारीक संघर्ष असेल. परंतु हातवारे किंवा शारीरिक संघर्ष झाला नसल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील डीएड बेरोजगारांना नोकरी मिळावी हा आपला उद्देश आहे. त्यासाठी मंत्री केसरकरांना भेटीसाठी बोलविल्याचे राणे यांनी सांगितलेे.

राणेंच्या भेटीत काही राजकीय चर्चा झाली का? अशी विचारणा पत्रकारांनी केसरकर यांना केली असता ना. नारायण राणेंच्या मुंबईतील निवासस्थानी आपण गणपतीला गेलो होतो. पत्रकारांच्या मनात आहे तसे काही नाही. राणेंबद्दल पूर्वीही आदर होता तसा तो आजही आहे. डीएड उमेदवार राणेंच्या भेटीला आले होते, त्यामुळे राणेंनी आपल्याला भेटीसाठी बोलवले होते. राणेंची भेट ही जिल्ह्याच्या विकासासाठी होती. ते विकासाबाबत चांगले मार्गदर्शन करत असतात. जिल्ह्याच्या विकासासाठी काही नवीन करता येईल का? याबाबत लवकरच एकत्र बसून चर्चा करणार आहोत.

टीईटी परीक्षा देता येत नसल्याने या डीएड उमेदवारांबाबत कोणता मार्ग काढता येईल याबाबत चर्चा केली. रत्नागिरीप्रमाणे 9 हजार मानधनावर तासिका तत्वावर काम करण्याची डीएड उमेदवारांची तयारी आहे का? हे जाणून घेतले. लवकरच राज्य सरकार ज्युनिअर, सिनअर केजी सुरू करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडे तयार करून त्यामध्ये डीएड बेरोजगारांना सामावून घेण्याबाबत राणेंसोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. गावातल्या गावातच या बेराजगार उमेदवारांसाठी काही करता येईल का? याबाबत चर्चा झाल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button