अखेर ७ वर्षांनी कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण | पुढारी

अखेर ७ वर्षांनी कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण

रत्नागिरी, पुढारी ऑनलाईन : सात वर्षांनी कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम १०० टक्के शंभर टक्के पूर्ण झाले आहे. या मार्गावर रेल्वेचा प्रवास येत्या काही दिवसांत वेगवान आणि प्रदूषणमुक्त होणार आहे. सहा टप्प्यातील विद्युतीकरणाचे कामे पूर्ण झाले असून टप्प्याटप्प्याने वीजेवरील गाड्या धावण्यास सुरूवात होईल, अशी माहिती प्रशासनाकडून सांगण्यात आली आहे.

भारतीय  रेल्वेतर्फे ‘मिशन–नेट झिरो कार्बन उत्सर्जनाच्या दिशेने वाटचाल’ या योजनेअंतर्गत पर्यावरणपूरक, हरित आणि स्वच्छ वाहतुकीसाठी संपूर्ण ब्रॉडगेज नेटवर्कचे विद्युतीकरण करण्यात येत आहे. केंद्र सरकार रेल्वे विद्युतीकरणातून हरित वाहतुकीचा टप्पा पूर्ण करत आहे. त्यात कोकण रेल्वेचा समावेश करण्यात आला आहे.

कोकण रेल्वेचा संपूर्ण मार्ग ७४१ किलोमीटरचा आहे. त्याच्या विद्युतीकरणाची पायाभरणी नोव्हेंबर २०१५ मध्ये करण्यात आली. या प्रकल्पाची एकूण किंमत १ हजार २८७ कोटी रुपये आहे. त्यानंतर करोना काळातही काम चालू ठेवले होते. संपूर्ण कोकण रेल्वे मार्गाची सुरक्षाविषयक तपासणी मार्च २०२० पासून सहा टप्प्यांमध्ये यशस्वीरित्या करण्यात आली.

रत्नगिरी आणि थिविम दरम्यानच्या शेवटच्या विभागाची तपासणी २४ मार्चला झाली. त्याचा अहवाल २८ मार्चला अधिकृतरित्या रेल्वे सुरक्षा विभागाकडून प्राप्त झाला. कोकण रेल्वेचा अवघड भूभाग आणि प्रतिकूल वातावरणामुळे हा विद्युतीकरण प्रकल्प हे रेल्वे प्रशासनापुढे आव्हानात्मक होते. मात्र त्या परिस्थितीवर मात करत रेल्वे प्रशासनाने काम पूर्ण केले. पावसाळ्यात तीव्र पडणाऱ्या पावसामुळे विद्युतीकरण मोहीम अखंड सुरू राहण्यासाठी अनेक ठिकाणी विशेष व्यवस्था करावी लागली आहे.

गोव्याकडील भागातील टप्प्याचे काम सर्वात प्रथम पूर्ण झाले. त्यानंतर रोहा ते रत्नागिरी या टप्प्याचे काम करण्यात आले. सर्वात शेवटी रत्नागिरी ते थिविम या ९० किलोमीटरच्या भागाचे विद्युतीकरण झाले. करबुडेसारखे मोठे बोगदे या मार्गावर असल्यामुळे विद्युतीकरणाची यंत्रणा बसवण्याचे सर्वाधिक आव्हान प्रशासनापुढे होते.

Back to top button