ऊस दराबाबत विखे कारखाना सर्वात पुढे राहील : खा. डॉ. सुजय विखे | पुढारी

ऊस दराबाबत विखे कारखाना सर्वात पुढे राहील : खा. डॉ. सुजय विखे

लोणी : पुढारी वृत्तसेवा : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पा. साखर कारखान्याचा प्रवास यशस्वी दिशेने सुरु झाला आहे. चांगले- वाईट दिवस अन् प्रदीर्घ संघर्ष करून, सहकार चळवळ टिकवून ठेवण्यासाठी इतर कारखान्यांनाही सहकार्य केले, परंतु आता डॉ. विखे पा. कारखाना स्वतंत्र झाल्याने प्रवरा कुटुंबातील सभासदांच्या उत्कर्षासाठीच यापुढे वाटचाल असेल, असा ठाम विश्वास व्यक्त करुन, ऊस भावाच्या स्पर्धेत कारखाना इतरांच्यापुढे असेल, अशी ग्वाही खा. डॉ. सुजय विखे पा. यांनी दिली. पद्मश्री डॉ. विखे पा. साखर कारखान्याच्या 73 व्या गळीत हंगामाची सुरुवात खा.डॉ. विखे पा. यांच्या उपस्थितीत करण्यात आली. माजी चेअरमन डॉ. भास्करराव खर्डे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा परिषद माजी अध्यक्षा शालिनीताई विखे, गणेश कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव सदाफळ, व्हा. चेअरमन विश्वासराव कडू, प्रवरा बँकेचे चेअरमन अशोकराव म्हसे, ट्रक्स सोसायटीचे चेअरमन नंदू राठी, चेअरमन गीताताई थेटे, भाजप तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी, संचालक, अधिकारी, कामगार याप्रसंगी उपस्थित होते.

खा. विखे म्हणाले, विखे पा. कारखाना आता स्वतंत्र झाला आहे. राहुरी कारखान्याचा ताबा जिल्हा बँकेने घेतला आणि गणेश कारखान्याचा करार संपला असला तरी त्यांचे सभासद न्यायालयात गेल्याने सभासदांनी मागणी केल्याशिवाय तेथील कराराबाबत आज बोलणे उचित होणार नाही. कारण न्यायालयीन प्रक्रिया सुरु असल्याकडे लक्ष वेधत आता फक्त आपलाच कारखाना केंद्रस्थानी ठेवून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्या मार्गदर्शनाखाली गाळप उद्दिष्ट पूर्ण करा, असे आवाहन त्यांनी केले.
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकार मंत्रालय स्थापन केले. सहकारी साखर कारखानदारीबाबत ते मोठे निर्णय घेत आहेत. केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांच्या माध्यमातून राज्यातील सहकार चळवळ सक्षम होत असल्याचे नमूद करून, खा. डॉ. विखे पा. म्हणाले, यंदा प्रथमच कारखाना व्यवस्थापन, कामगार व यंत्रणा सज्ज आहे, परंतु शेत तयार नाही. मोठ्या पावसाने ऊस तोडणी कशी सुरू करायची, असे आव्हान असल्याचे सांगत जेवढा कालावधी मिळेल, त्यामध्ये गाळप पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक व्हा.चेअरमन विश्वासराव कडू यांनी केले.

शेतकरी, कामगारांची मोठी साथ : खा. विखे
आपल्या कारखान्याने संघर्षाचा काळ पाहिला, वाईट दिवसही अनुभवले.परंतु, यातून चांगले दिवस आता आपण पाहत असल्याचे सांगत, यासर्व संघर्षात सभासद, शेतकरी व कामगारांनी मोलाची साथ दिली. आपल्या सर्वांच्या पाठबळानेच मंत्री विखे पाटील राज्यात मोठ्या मंत्रिपदावर पोहचले. याची उतराई म्हणून इतरांपेक्षा चांगला भाव देण्याच्या स्पर्धेत डॉ. विखे पाटील कारखाना सर्वांच्या पुढे असेल, असा ठाम विश्वास खा. डॉ. सुजय विखे पा. यांनी व्यक्त केला.

Back to top button