केंद्रीय तपास यंत्रणा कोण कोणाचा नातेवाईक आहे हे पाहून कारवाई करत नाहीत : देवेंद्र फडणवीस
शिर्डी, पुढारी वृत्तसेवा ः भाजपाने भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर काढली आहेत, यावर उत्तर देण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे. मात्र त्यांच्याकडे कोणतेही उत्तर नसल्याने त्यांनी भावनिक भाषण केले असल्याची टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
फडणवीस म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणा तथ्यांच्या आधारावर तपास करीत आहे. कोण कोणाचा नातेवाईक आहे, हे बघून कारवाई करीत नाही. कोणाला कुणाच्या कुटुंबापर्यंत जायचा काही प्रश्नही नाही. किरीट सोमय्या यांचे आज प्रतीकात्मक हातोडा आंदोलन होते. कारवाई न्यायालय किंवा संस्था करणार आहे. भाजपाची संघर्षाची भुमिका असून आम्ही कुठल्याही कारवाईने दबणार नाही आणि भ्रष्टाचाराविरोधातला आवाज उचलतच राहणार. उद्धव ठाकरेंचे वक्तव्य गांभिर्याने घेण्याची गरज नाही. आम्ही २०२४ साली स्वबळावर सरकार स्थापन करणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
साई दर्शनासाठी देवेंद्र फडणवीस शिर्डीत आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के, माजीमंत्री गिरीश महाजन, आ. अभिमन्यू पवार, माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.