मोदीजीच होणार पंतप्रधान, एक मंत्रीपद मागितले : रामदास आठवले
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यात लोकसभेच्या ४५ पेक्षा जास्त जागा महायुती आणि देशात ४०० पेक्षा जास्त जागा एनडीए जिंकेल. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत असा विश्वास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पत्र परिषदेत व्यक्त केला. नरेंद्र मोदी संविधान बदलण्याचे काम करत आहेत ही काँग्रेसकडून नागरिकांची दिशाभूल केली जात आहे. संविधानात नवीन कायदे करणे म्हणजे संविधान बदलणे असा होत नाही. राहुल गांधीकडून आंबेडकरी समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे मी आंबेडकरांच्या अनुयायांना आवाहन करतो की काँग्रेसच्या खोट्या भूलथापांना त्यांनी बळी पडू नये. लोकसभेच्या निवडणुकीसाठी पंतप्रधानांच्या विभागावर दोन सभा आहेत. मी लोकसभेसाठी २ जागा मागितल्या होत्या मात्र मला त्या देण्यात आल्या नाहीत. शिर्डीच्या जागेसाठी प्रयत्न केले. मात्र लोकसभेसाठी शिवसेना गटातील सदाशिव लोखंडे यांचे नाव पुढे आल्यामुळे आम्ही माघार घेतली. केंद्रात आम्हाला कुठलेही कॅबिनेट मंत्रीपद देण्यात यावे अशी विनंती आम्ही भाजपकडे केली आणि त्यांनी आमच्या विनंतीवर विचार करू असे आश्वासन देखील दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रथ पुढे सरकत आहे. सरकारने ५ वर्षांसाठी ८३ कोटी लोकांना मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रायबलचे बजेट एक लाख कोटीवर केले आहे. काँग्रेसच्या ७० वर्षांच्या राजवटीत देशात कोणताही विकास झाला नाही. त्यामुळे देशातील १४० कोटी जनता नरेंद्र मोदींसोबत आहे यावर भर दिला.