नाशिकच्या नऊवर्षीय बाल गिर्यारोहकाने सर केले तीन खडतर किल्ले | पुढारी

नाशिकच्या नऊवर्षीय बाल गिर्यारोहकाने सर केले तीन खडतर किल्ले

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा
तालुक्याला सह्याद्रीची पर्वतरांग लाभलेली आहे. या पर्वतरांगेतील अलंग, मदन आणि कुलंग किल्ले अंत्यत खडतर समजले जातात. धाडसी गिर्यारोहकही या किल्ल्यांपुढे नतमस्तक होत टप्प्याटप्प्याने तिन्ही किल्ले सर करतात. मात्र घोटीतील विहान भूषण धांडे या धाडसी आणि जिद्दी चिमुकल्याने वडिलांच्या साथीने एकाच वेळी तिन्ही किल्ले सर केले. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अलंग, मदन आणि कुलंग हे तिन्ही किल्ले एकाच वेळी सर करण्याचा निर्धार नऊ वर्षांच्या विहानने व्यक्त केला होता. मात्र हे तिन्ही किल्ले खडतर व अवघड असल्याने आरंभीच्या काळात वडील डॉ. भूषण धांडे नकार दिला. मात्र विहान हा जिद्दीला पेटल्याने अखेर हे किल्ले पादाक्रांत करण्याचे निश्चित झाले. आग ओकणारा सूर्य, अरुंद पाऊलवाट, पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष, जागोजागी पायर्‍या नसल्याने रॉक क्लाइम्बिंग करून चढाई अशी खडतर कसरत करीत विहान यांने वडिलांच्या साथीने सलगपणे तिन्ही किल्ले यशस्वीपणे सर केले. विहान याला या मोहिमेत डॉ. धांडे, कळसुबाई मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे, घाटघर येथील एकनाथ खडके आदींचे मार्गदर्शन लाभले.

विहानला बालपणापासूनच ट्रेकिंगचा छंद
घोटीतील अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. भूषण धांडे यांना ट्रेकिंगचा छंद आहे. तो छंद मुलगा विहान याला बालपणापासूनच जडला आहे. वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विहानने लहानपणापासूनच अनेक लहान व सोपे गडकिल्ले सर केले आहेत.

हेही वाचा:

Back to top button