Water : आरोग्यदायी शरीरासाठी पाणी किती आणि कसं प्यावं? जाणून घ्या...
पुढारी ऑनलाईन डेस्क : पाणी हा पृथ्वीवरील आणि सजीव जीवनातील महत्वाचा घटक आहे. पाणी हे मानवी शरीराला आवश्यक असणारे प्रमुख द्रव्य आहे. प्रत्येकाच्या शरीराला पाण्याची आवश्यकता ही वेगवेगळी असते. तज्ज्ञांच्या मतानुसार मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण हे अधिकांश म्हणजेच ६६ टक्के असते. प्रत्येक व्यक्तीचे वय आणि वजनानुसार प्रत्येकाच्या शरीराला लागणारे पाण्याचे प्रमाण हे भिन्न असते, त्यामुळे साधारण प्रत्येकाने दिवसभरात दीड ते दोन लिटर पाणी पिणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येते. चला तर जाणून घेऊया आरोग्यदायी शरीरासाठी पाणी किती आणि कसं प्यावं…
- सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिणे फायदेशीर असते. पण त्याचे प्रमाण एक लिटरपेक्षा अधिक नसावं. असे पाणी अधिक पिल्यास ते शरीराला घातक ठरू शकते.
- याऐवजी रोज सकाळी उठून ब्रश केल्यानंतर आणि रात्री झोपताना एक ग्लास कोमट पाणी घ्या. यामुळे पोटाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होऊ शकते.
- कितीही घाईगडबड असली तरी पाणी उभे राहून घटाघटा पिवू नका. कारण पाणी पिल्यानंतर ते घशातून थेट पोटातील खालच्या भागात जातं. यामुळे या भागातील नाजूक अवयवांना इजा होऊ शकते.
- खाण्यासोबत मध्येमध्ये पाणी पिण्याची तुम्हाला सवय असेल तर ती तुमच्या शरीराला घातक ठरू शकते. अन्नाबरोबर पाणी पिल्याने पोटातील गॅसचे प्रमाण वाढते. यामुळे अन्न पचनास त्रास होऊ शकतो.
- त्यामुळे सकाळी व संध्याकाळी जेवण्यापूर्वी किमान अर्धा तास किंवा जेवणानंतर अर्ध्या तासाने पाणी पिणे आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते.
- व्यायाम करताना किंवा खेळताना तहान लागणे स्वाभाविक आहे. त्यामुळे व्यायाम करताना किंवा कोणताही खेळ खेळताना एखादा घोट पाणी तुम्ही पिऊ शकता. व्यायाम करण्यापूर्वी किंवा व्यायाम झाल्यानंतर तुम्ही ग्लासभर पाणी घोटघोट पिऊ शकता.
- दिवसभरात साधारणत: १ ते २ लिटर पाणी पिणे मानवी शरीरासाठी आरोग्यदायी ठरू शकते, त्यामुळे पाणी अशा पद्धतीनेच प्यावे.
- फ्रिजमधील थंड पाणी घटाघटा पिऊ नका, यामुळे आरोग्याला हानी पोहचू शकते.
- तांब्याच्या भांड्यात रात्री पाणी ठेवून ते सकाळी प्यायल्याने पाचनक्रिया सुधारते. तसेच तांब्याच्या भांड्यातील पाणी पचनक्रिया सुधारुन पचनशक्ती वाढवते, त्यामुळे या भांड्यातून पाणी पिल्याणे शरीरीला हे फायदेशीर ठरू शकते.