प्रासंगिक : स्वरांचा हिरवा ऋतू! | पुढारी

प्रासंगिक : स्वरांचा हिरवा ऋतू!

संतोष देशपांडे

‘ज्यांची हृदये झाडांची, त्यांनाच फक्त फुले येतात!’ अशी मंगेश पाडगावकरांची एक कविता आहे. असं झाडांचं हृदय असणारी, रसरशीत जगणारी माणसंच या एरवी रुक्ष असणार्‍या जगात ओलावा भरतात, हे जग सर्वांसाठी सुंदर बनवतात. आशा भोसले यांचा आवाज, त्यांची गाणी याच प्रकारातली. रसरशीत, जगणं सुरेल-सुंदर बनवणारी! येत्या 8 सप्टेंबर रोजी त्यांना 90 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने…

कल्पना करा, तुम्ही कोणत्या तरी कारणानं अत्यंत अस्वस्थ आहात, बैचेन आहात. मन लागत नाही आणि तितक्यात एक गाणं तुमच्या कानी पडतं, ‘छोड दो आँचल, जमाना क्या कहेगा…’ तुम्ही सारा ताण विसरून त्या गाण्यात सामील होऊन जाता. आशाताई आणि किशोरदांच्या या चारेक मिनिटांच्या गाण्यानं तुमच्या मनावरचा मोठ्ठा बोजा पार हलका करून टाकलेला असतो.

किंवा तुम्ही कोकणात प्रवासाला निघाला आहात. एफएमवर (अधून मधून ऐकू येणार्‍या) त्याच त्याच गाण्यांना विटला आहात. मग ‘ऋतू हिरवा’ ऐकायला सुरुवात करा. ‘मन भावण, हा श्रावण…. नभी उमटे इंद्रधनू….’ एकेक शब्द कानात नकळत साठले जातात आणि मनातही जणू पाऊस सुरू होतो. तो आनंद मिळणे सुरू होईस्तोवर ‘घनरानी’ ऐकू येतं…. तो गोडवा उरात पाझरेस्तोवर ‘फुलले रे क्षण माझे’ सुरू होतं आणि खरोखर एका अलौकिक नादब्रह्मात आपण रममाण होऊन जातो. आपल्या रुक्ष जगण्यावर स्वप्नांचं चांदणं शिंपित जातं. आशाताईंची अशी कितीतरी गाणी जगण्यावर नितांत प्रेम करायला लावतात. त्यात भरलेलं चैतन्य भवतालाचा गाभारा भारून टाकतात.

आशाताईंचा आवाज कोणत्या शब्दांत वर्णावा? तो अवखळ आहे, खळखळता आहे, तो निरालस आहे, तो प्रवाही आहे. तो डोळ्यांतूनही गातो आणि मनातून वाहतो. तो बंदिस्त करता येत नाही आणि त्याची सुटकाही करता येत नाही. ‘बस एक बार मेरा कहा, मान लिजिए’ या शब्दांना या आवाजाखेरीज कुणीच न्याय देऊ शकत नाही. ‘कहिये तो आसमां को जमीन पर उतार लाएँ’ असा गगनाला स्पर्शू पाहणारा आवाज तितक्यात नजाकतीनं हळुवार ‘जमीन’पर उतरला जातो आणि पुढे ‘मुश्किल नही हैं कुछ भी अगर ठान लिजिए’ म्हणत एका विलक्षणाचं गारुड आपल्या मनावर घालून जातो. खय्यामसाहेब यांनी ‘उमराव-जान’मधील गाणी आशाताईंच्याच आवाजात करण्याचं का ठरवलं होतं, याचं उत्तर तेव्हा अनेक टीकाकारांना या गाण्यांचं रेकॉर्डिंग झाल्यानंतर आपसुकच मिळालं आणि आजही त्यातील प्रत्येक गझल रसिकांच्या मनात घट्ट रुतून बसली. 1950 च्या सुमारास आशाताईंनी पार्श्वगायनास सुरुवात केली. मात्र तेव्हा लतादीदी, गीता दत्त, शमशाद बेगम अशा गायिकांचं राज्य होतं. घरची परिस्थितीही खडतर आव्हानांनी भरलेली होती. तरीही, आशाताईंनी वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचं आव्हान स्वीकारलं आणि आपल्या आत्मविश्वासाच्या बळावर ते पूर्ण करून दाखवलं. तब्बल सात दशकांहून अधिक असा त्यांचा गानप्रवास आणि त्यातील विविध टप्पे केवळ स्तिमित करून टाकतात, ते त्यामुळे.

आशाताईंना खरा ब्रेक मिळाला तो 1957 मध्ये, सचिनदेव बर्मन यांच्यामुळे. ‘काला बाजार’, ‘लाजवंती’, ‘नौ दो ग्यारह’, ‘सुजाता’, ‘चलती का नाम गाडी’ अशा एकाहून एक चित्रपटांमुळे आशा भोसले हे नाव रसिकांच्या मनात रुजलं गेलं आणि पुढे आणखी फुलत गेलं. ओ. पी. नय्यर आणि आशाताईंची स्वत:ची अशी केमिस्ट्री होती. 60 च्या दशकातील त्यांच्या बहुतांश चित्रपटांत आशाताईंचीच गाणी होती आणि ती प्रचंड हिट झाली. आशाताईंच्या गाण्यातलं वेगळंपण, त्यातील उत्स्फूर्तता ओ. पी. नय्यर यांनी हेरली आणि त्यास पुरेपूर न्याय देणार्‍या रचना संगीतबद्ध केल्या. ‘फिर वही दिल लाया हूँ’मधील ‘आखोंसे जो उतरी है दिल मैं’ हे प्रवाही गाणं असो, वा ‘चैन से हमको कभी आपने जिने ना दिया’सारखं अलग ठहेराव असणारं गाणं आशाताईंचा आवाज दोन्ही ठिकाणी तुमच्यात त्यातील भाव पाझरत नेतो.

आशाताईंचा आवाज म्हणजे एक प्रकारे परीसच! ज्या ज्या शब्दांना तो लाभला, त्यांचं सोनं झालं. आता गुलाम अलींसोबतचा त्यांच्या गझलसंग्रह ‘मिराज-ए-गझल’चं घ्या. ‘सलोना सा सजन है’ आजही प्रत्येकाला साद घालतं. ‘करू ना याद मगर, किस तरह भुलाऊं उसे,’ असं म्हणत पुढं जेव्हा ‘गझल बहाना करू और भुलाऊं उसे’ हे शब्द कानी येतात, तेव्हा ते कानातून नाहीतर स्पंदनातून मनात विसावतात. आशाताईंचं आणि गझलगायकीचं हे असं अद्वैत रसिकांना कायमच भुरळ घालत राहतं. अलीकडच्या काळातही, आपल्या जरा हटके स्टाइलमध्ये त्यांनी ‘आज जाने की जिद ना करो,’ ही जुनी आपल्या शैलीत सादर केली, ती प्रचंड गाजली.

किशोरदांचं आणि आशाताईंचं ट्युनिंगही लै भारी होतं. त्यांची कित्येक युगलगीतं आजही प्रचंड लोकप्रिय आहेत. ‘बाप रे बाप’ या चित्रपटासाठी ‘पिया पिया पिया, मेरा जिया पुकारे’ या गाण्याचं रेकॉर्डिंग होताना एके ठिकाणी आशाताईंनी चुकून किशोरदांसाठी असणारी ओळ गायला सुरुवात केली आणि ते लक्षात येताच थांबल्या. पण किशोरदांनी ते गाणं पूर्ण केलं. चित्रपटाचे नायक किशोरदाच होते. त्यांनी या गाण्याच्या चित्रीकरणावेळी आशाताईंचा ती अर्धवट म्हटली गेलेली ओळ येताच, आपल्या नायिकेच्या तोंडावर अलगद हात ठेवला आणि पुढची ओळ आपल्याच आवाजात डब केली. अर्थात, हे सारं इतकं बेमालूमपणे जमून गेलं की, प्रेक्षकांना पडद्यावर ते गाणं पाहताना, किशोरदांची ही अदा एकदम पसंद पडली. सचिनदा बर्मन यांच्या कित्येक गाण्यांमधून आशाताई आपल्यापर्यंत पोहोचल्या आहेत. ‘दिवाना मस्ताना हुआ दिल’, ‘आखोंमें क्या जी’, ‘ये रातें ये मौसम’, ‘हाल कैसा है जनाब का’ अशा कितीतरी गाण्यांनी आपल्या मनात चैतन्य भरलं आहे. जयदेव यांच्या ‘अभी ना जाओ छोड के’ या गीताबाबतही तेच. ‘तोरा मन दर्पण कहेलाएँ’ यासारखं गाणं कधीही, कुठूनही कानी पडलं की आपोआप अंतर्मुख व्हायला होतं. पंचमदांची आणि आशाताईंची गाणी हादेखील स्वतंत्र लेखाचा विषय ठरतो. तब्बल सात दशकांचा पार्श्वगायकीचा हा प्रवास पाहता, आशाताईंचा आवाज इतका लोकप्रिय का राहिला? असा कुणी प्रश्न विचारला, तर त्याची उत्तरं अनेक आहेत. मात्र एक निश्चित आहे; ते म्हणजे, हा आवाज कायम समकालीन किंवा रेलेव्हंट राहतो.

आशाताईंनी जवळपास 14 भाषांमध्ये कैक हजार गाणी गायली आहेत. मात्र, आपणा सर्वांना अभिमान वाटावा तो भाग म्हणजे, त्यांनी आपल्या मायबोली मराठीतही तितकंच विलक्षण काम केलं आहे. नाट्यगीतं, भक्तिगीतं, गझल, भावगीतं, चित्रपटगीतं असे सारेच प्रकार त्यांनी हाताळले आहेत. आजही आशाताईंचं गाणं ऐकलं नाही, असा एकही दिवस जात नाही. ‘झाले युवती मना’, ‘कठीण कठीण किती’, ‘शूरा मी वंदिले’ अशी नाट्यगीतं असोत की, ‘काल पाहिले मी स्वप्न गडे’, ‘रिमझिम पाऊस पडे सारखा’, ‘अरे मनमोहना’, ‘आज चांदणे उन्हात हसले’, ‘आज प्रीतीला पंख हे लाभले’, ‘एका तळ्यात होती’, ‘का रे दुरावा’, ‘गेले द्यायचे राहून’, ‘चंद्र आहे साक्षीला’, ‘कानडावो विठ्ठलू’ ….किती किती गाणी सांगायची. प्रत्येकाचा बाज वेगळा. प्रत्येकातून मिळणारा आनंद आगळा. ‘भाऊ’ चित्रपटातील सुरेश वाडकरांसोबतचं ‘गंध फुलांचा गेला सांगून’ ऐकल्यानंतर काय जाणवतं, हे शब्दांत कसं लिहिणार? ‘राधा गौळण करिती मंथन, अविचरत हरीचे मनात चिंतन’ या आवाजातून लाभलेला चिरंतर आनंद आणखी कुठं लाभू शकतो?

सुधीर मोघेंच्या अनेक रचनांना आशाताईंनी आपल्या आवाजातून अजरामर करून टाकलंय. ‘एकाच या जन्मी जणू, फिरूनी नवे जन्मेन मी’ हे आशादायी शब्द खुद्द आशाताईंच्याच आवाजात ऐकायला मिळतात, तेव्हा अशी गाणी ऐकण्यासाठी तरी फिरून फिरून जन्म घ्यावासा वाटतो. आरती प्रभूंची ‘गेले द्यायचे राहूनी’ असो, वा शांताबाईंची ‘जिवलगा, राहिले रे दूर घर माझे’ अशा मनात हुरहुर पेरणार्‍या रचना असोत की, ‘सैनिकहोऽ तुमच्यासाठी…’सारखी देशभक्तांच्या भावना व्यक्त करणारी अजरामर रचना असो. आशाताईंच्या प्रत्येक गाण्यानं आपलं स्थान रसिकांच्या मनात अढळ करून टाकलं आहे. ‘जगाच्या पाठीवर’मधील ‘तुला पाहते रे, तुला पाहते’ कितीही वेळा ऐकलं तरीही मन भरत नाही. याच चित्रपटातील ‘बाई मी विकत घेतला श्याम’ ऐकणं म्हणजे स्वत:लाच वेगळ्या उंचीवर घेऊन जाणं. बाबूजींसमवेत, म्हणजेच सुधीर फडके यांसमवेतही त्यांची कित्येक युगलगीतं मराठी रसिकमनात सदैव गुणगुणली जातात.

‘मलमली तारुण्य माझे’ हे 1970 मधील ‘घरकूल’ चित्रपटातील गीत आठवतंय. तब्बल पाच दशकं होऊनदेखील हे गाणं तितकंच तरुण आहे. सुरेश भटांच्या या गझलेचं गीतात रूपांतर होतानाचा प्रवास कसा झाला असेल, याची नुसती कल्पना केली तरी अंगावर रोमांच उभे राहतात. पांघरावे हा शब्द ऐका; गुंतवावे, पेटवावे हा प्रत्येक शब्दोच्चार आणि शेवटी, ‘रे तुझ्या बाहूत माझ्या, रूपगंधा जाग यावी’ असं म्हणत अखेरीस ‘मलमली तारुण्य माझे’ असं द्रुतात व सरतेशेवटी ‘..तू पहाटे पांघरावे,’ असा मंद लयीत शब्दोच्चार होतो तेव्हा जो काही इफेक्ट साधला जातो, तो तस्साच्या तस्सा… गेली 50 वर्षे आहे. विचार करताना, ही शब्दांची जादू की स्वरांची..? हे कोडं आपलं अर्धं आयुष्य कुरतडतो… पण गाणं पुन्हा ऐकताना कोडं उलगडणं दूरच, त्या गाण्यात आपण इतकं गुंतून जातो की, या शब्दसूरांनी आपल्या भावभावनांना रोज पुन:पुन्हा पांघरावे, असंच वाटू लागतं. अशा कैक चिरतरुण गीतांचं विश्वरूपदर्शन आपणा सर्वांना घडविणार्‍या आशाताईंचा नव्वदीतील प्रवास म्हणजे त्यांच्या चैतन्यमयी स्वरांचा नव्या तारुण्यात प्रवेश, असं वर्णन केल्यास ते चुकीचं ठरणार नाही. आशाताईंचा आवाज कशातच बंदिस्त करता येत नाही… अगदी वय आणि वर्षांमध्येही. ते आपलं चांदणं शिंपित जातं… चैतन्याची पखरण करत जातं… जाणिवांना जागवत राहतं आणि कधी कधी.. घनरानी वाट चुकवीत जातं.. स्वतःच्या सच्चेपणाला, अस्सलतेला आणि अस्तित्वाला शोधण्यासाठी!

लतादीदींचं माधुर्य आणि आशाताईंचा गोडवा!

खरं तर मंगेशकर भावंडांना संगीताचा वारसा त्यांच्या वडिलांकडून, म्हणजेच मास्टर दीनानाथ मंगेशकरांकडून लाभलेला. मंगेशकर भावंडांचे बालपण अत्यंत खडतर परिस्थितीत गेलं. सर्वात मोठ्या लतादीदी, त्यांनी आपल्या गायकीच्या बळावर घरची धुरा सांभाळली. पाठोपाठ आशाताईही आल्या. उषा मंगेशकर यांनीही मराठी पार्श्वगायनात आपला ठसा उमटविला. पं. हृदयनाथ यांनी गायक आणि संगीतकार म्हणून मोठा लौकिक मिळविला. अनेकदा आशाताईंची लतादीदींशी तुलना केली जाते. काहींना वाटते की, लतादीदींना लाभलेले कौतुक आशाताईंच्या वाटेला आले नाही. असं असलं तरी, या दोघीही आपापल्या ठिकाणी महान आहेत. त्यांची गायनशैली एकमेकींपासून निराळी राहिली आहे. लतादीदींच्या इतक्या जवळ असूनही आशाताईंनी आपल्या गायकीवर त्यांची सावली पडू दिली नाही. त्यांनी स्वतःची शैली निर्माण केली. आवाजातील सहजता, उत्स्फूर्तता आणि नजाकत ही त्यांच्या शैलीची वैशिष्ट्यं ठरतात. लतादीदींच्या आवाजातील माधुर्य आणि आशाताईंच्या आवाजातील गोडवा हे आपापल्या ठिकाणी केव्हाही श्रेष्ठ. माधुर्यात आपसूकच गोडवा असतो आणि गोडव्यात नकळत एक माधुर्यही असतं… तसं हे अद्वैत..! म्हटलं तर एकच, म्हटलं तर स्वतंत्र. जिथं हे एकत्र उमललं, नांदलं, ते म्हणजे मंगेशकर कुटुंब!

Back to top button