राज्‍यरंग : महाराष्ट्राचं अस्वस्थ वर्तमान! | पुढारी

राज्‍यरंग : महाराष्ट्राचं अस्वस्थ वर्तमान!

क्रूरकर्मा औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हाल हाल करून निर्घृण हत्या केल्याचा संताप प्रत्येक मराठी माणसाला आजही असतोच असतो; मग जात-धर्म कोणताही असो. त्यावेळीही तसंच होतं. आजवर तसंच होतं; मग अचानक औरंग्याला अभिमानानं मिरवणार्‍या प्रवृत्ती कुठून उपजल्या? हे आहेत तरी कोण?

सद्यपरिस्थितीत महाराष्ट्रात क्वचितच असा एखादा दिवस जात असेल की, जेव्हा काही भलतं-सलतं घडत नसेल. हिंदू-मुस्लिम तणाव आता उत्तरेतील काही राज्यांप्रमाणे महाराष्ट्राचीही ओळख बनू पाहतोय की काय, अशी भीती भेडसावू लागली आहे. महाराष्ट्रानं जिहादी शक्तींना कधीच जुमानलं नाही. इतिहासापासून आजवर महाराष्ट्रानं अशा जिहादींना रोखलंय. मात्र, आता एक वेगळंच जिहाद अवघ्या महाराष्ट्राला अस्वस्थ करू लागलं आहे. हे जिहाद म्हटलं तर सामाजिक, म्हटलं तर राजकीय आहे. ते आहे लव्ह जिहाद!

गेले काही महिने देशाप्रमाणेच महाराष्ट्रातही लव्ह जिहाद हा शब्द जास्तच चर्चेत आणला जात आहे. हिंदू तरुणींना मुस्लिम तरुण फुस लावतात. प्रेमाच्या जाळ्यात ओढतात, त्यातून पुढे धर्मांतर आणि निकाह. त्यालाच लव्ह जिहाद संबोधलं गेलं. त्यातूनच लव्ह जिहाद… लव्ह जिहाद… असा घोषा तर खूप लावला गेला. जात आहे. हिंदू तरुणी-मुस्लिम तरुण अशा लग्नाच्या घटना यापूर्वी घडत नव्हत्या, असं नाही. त्यातून त्या-त्यावेळी स्थानिक पातळीवर तणाव निर्माण होत नसे, असंही नाही. आपल्या समाजातील स्त्री दुसर्‍या समाजात जाणं, हे अनेकदा पुरुषी मानसिकतेला खटकतंच. त्यातून संघर्षही होत असे. नाही असे नाही; पण ते स्थानिक पातळीवर, तेवढ्यापुरता असे. आता कुठंही असं काही घडलं की, लगेच लव्ह जिहादचा घोष सुरू होतो आणि मोर्चे काढण्याचं एक सत्रही सुरू होते. त्यातून पूर्वी स्थानिक पातळीवर असणारा विषय आता राज्यपातळीवरील विषय बनतो. नव्हे बनू लागला आहे. राज्य पातळीवरील नेते आक्रमकतेने त्यावर बोलतात. त्यातून लव्ह जिहादचा मुद्दा हा महाराष्ट्रभरात वातावरण तापवणारा ठरतो. लव्ह जिहादविरोधी अशा मोर्चांमधूनच मग संघर्षही उफाळू लागतो. नगर जिल्ह्यात समनापूरमधील संघर्ष हा अशा मोर्चानंतरचाच! तसेच शेवगाव, संगमनेर आणि नगर शहरातही तणाव निर्माण होणार्‍या घटना घडल्या.

महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येनं मराठा क्रांती मोर्चे निघालेत. तेही एक-दोन नाही, तर तब्बल 57 ठिकाणी निघालेत. लाखोंची संख्या असायची; पण सकल मराठा समाजाच्या नावाने निघालेले हे मोर्चे प्रत्येक ठिकाणी शांतता आणि शिस्तीचा आदर्श घालून देत असत. त्याच महाराष्ट्रात सकल हिंदू समाजाच्या नावाने मोर्चे निघाले की, शांतता बिघडण्याची भीती का निर्माण होते? त्यात मोर्चात सामील होणार्‍यांपेक्षा आगलावी वक्तव्ये करणारे नेतेच जबाबदार असल्याचं म्हटलं जातं. अर्थात, हे एकाच बाजूने होते, असे नाही. नगरच्या संगमनेर तालुक्यातील समनापूरमधील तणावानंतर एका नेत्याने मोर्चेकरी परतताना काहींनी दगडफेक केली. त्यातून हिंसाचार झाल्याचा आरोप केला. दगडफेक करणार्‍यांनी आधीच दगड आणले होते, असाही आरोप त्यांनी केला. जर नेते सांगतात, तशी मोर्चेकर्‍यांवरील दगडफेक पूर्वनियोजित होती, तर पोलिसांनी आधीच खबरदारी का घेतली नव्हती, असा प्रश्न निर्माण होतो.

कारण, याआधीही नगरच्याच शेवगावमध्ये छत्रपती संभाजी महाराज मिरवणुकीच्या वेळी दगडफेकीच्या घटनांनी तणाव निर्माण झाला होता. त्यावेळीही एका समाजानं मिरवणुकीवर दगडफेक केल्याचा आरोप झाला. मात्र, त्याचवेळी मिरवणुकीतून एका प्रार्थनास्थळावर दगडफेकीचा आरोपही झाला. दगड पहिला कुणीही मारलेला असो, भंगली ती मात्र शेवगावची शांतताच!

दिल्लीतून दख्खनेत आलेल्या परक्या मुघल बादशहा औरंगजेबाविषयी आपुलकी बाळगेल, असा या अवघ्या महाराष्ट्रात, आपल्या मातीत, आपला माणूस असूच कसा शकतो? क्रूरकर्मा औरंगजेबाने आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करून त्यांची निर्घृण हत्या केल्याचा संताप प्रत्येक मराठी माणसाला आजही असतोच असतो; मग जात-धर्म कोणताही असो. त्यावेळीही तसंच होतं. आजवर तसंच होतं; मग अचानक औरंग्याला अभिमानानं मिरवणार्‍या प्रवृत्ती आता कुठून अचानक उपजल्या? हे आहेत तरी कोण? आजवर औरंग्याच्या समर्थनार्थ अ ही न उच्चारला जाणार्‍या ठिकाणीही एखाद्या कुनियोजित कटाप्रमाणे क्रूरकर्मा औरंगजेब फोटो, स्टेटस्मध्ये कसा झळकू लागला?

छत्रपती संभाजीनगरचे पूर्वीचे नाव औरंगाबाद. तेथे काही रझाकारी प्रवृत्तींकडून द्वेष उफाळताना दिसतोही. आता मात्र थेट औरंगजेब मिरवत इतरांना चिथावण्याचे प्रकार सुरू झाले. तेथे झाले तर ते इतरत्रही घडलं. त्यानंतर कोल्हापुरात तसं घडलंच कसं? कारण कोल्हापुरात सर्व होऊ शकतं; पण हिंदू-मुस्लिम संघर्ष आणि त्यातून तणाव, असं घडूच शकणार नाही, असं मानलं जात होतं; पण तेथेही औरंग्या मिरवण्यातून वातावरण तापवलं गेलं. पेटवलं गेलं. तेच मग इतर ठिकाणीही पसरलं.

आपल्याकडे अनेकदा धर्माच्या राजकारणावर मात करण्यासाठी जातीचा फॉर्म्युला सांगितला जातो. मंडलविरोधात कमंडल अशी आधीच्या मांडणीची आठवण करून दिली जाते. आजही तसं घडताना दिसतं. यावेळी मात्र महाराष्ट्राला अस्वस्थ करणार्‍या घटना एकाचवेळी धार्मिक तणावाच्या जशा आहेत, तशाच जातीय तणावाच्याही आहेत.

नांदेडच्या बोंढार हवेलीत अक्षय भालेराव या तरुणाची हत्या झाली. गावात आंबेडकर जयंतीची मिरवणूक नको म्हणून अक्षयची हत्या एका गटाचा आरोप, तर दुसर्‍यांचे म्हणणे, तशी मिरवणूक नव्हतीच असे सांगत खून झालेल्या अक्षयवरच आरोप करणारे. येथेही कारण काहीही असलं, तरी एका तरुणाची गावगुंडांकडून निर्घृण हत्या होणे, हे संतापजनकच आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावरही जातीय तणाव व्हायरल होऊ लागला. मात्र, जाणत्या नेटकर्‍यांनी वेळीच संयमाने तो टाळला. एकीकडे नांदेडचे बोंढार हवेली, तर दुसरीकडे लातूरमधील रेणापूर. तेथे गिरीधर तबकाळे यांनी सावकार लक्ष्मण मार्कंडकडून व्याजावर 3 हजार रुपये कर्ज घेतले होते; पण आर्थिक परिस्थितीमुळे ते फेडू शकले नाहीत. सावकार मार्कंड यांनी धमकावले. त्यानंतर गिरीधर पोलिसांकडे गेला. ते कळताच सावकाराने त्याच्या डोळ्यांमध्ये मिरचीपूड टाकत त्यांची निर्घृण हत्या केली. येथेही ज्याने जीव गमावला तो दलित समाजातील आहे.

महाराष्ट्रात जातीय तणावाच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. मात्र, आता एकीकडे महाराष्ट्र धार्मिक तणावाच्या घटनांनी अस्वस्थतेने खदखदत असताना जातीय तणावाच्या घटना अधिकच अस्वस्थ करणार्‍या आहेत.

औरंगजेब, लव्ह जिहाद, जातीयवाद. मुद्दे, कारणं काहीही असो; पण या सर्वच प्रकरणांमध्ये एक समान धागा आहे. तो आहे पोलिसांचा.
लव्ह जिहाद, औरंगजेब हे मुद्दे महाराष्ट्राला अस्वस्थ करू लागले आहेत. त्यासाठी काही प्रवृत्ती काम करू लागल्या आहेत. हे पोलिसांना कळलंच नसेल. पोलिसांनी ते रोखण्यासाठी काहीच केले नसेल?
धार्मिक ताणतणावासाठी कारणीभूत असणार्‍यांना दयामाया दाखवूच नये. मात्र, संभाजीनगरमध्ये ज्यांनी औरंगजेब नाचवला ते जामिनावर लगेच बाहेरही आले. असं कसं?

नगरमध्ये वातावरण तापतंय, याची पोलिसांना कल्पना होती. तरीही मोर्चा, मिरवणूक काहीही असलं तरी पोलिसांनी दगडफेक होऊ नये, यासाठी खरंच योग्य काळजी घेतली का, असा प्रश्नच आहे. राजकारण्यांना दगडफेकीसाठी दगड आधीच आणून ठेवले होते, याची माहिती मिळते; तर पोलिसांना ती आधीच मिळवून दगडफेक टाळता आली नसती? राजकारण्यांना परिस्थिती बिघडत असल्याचे संकेत लक्षात येत असतील, त्याची गंभीर दखल पोलिस का घेत नाहीत? तसं घडू नये, काही बिघडू नयेत, यासाठी आधीच काही दक्षत बाळगावी, पुरेशी तयारी करावी, असं पोलिसांनी काही केले नसेल, तर तसंही का घडलं यावर विचार गरजेचा आहे.

विरोधक म्हणतात, त्याच भागात दंगल घडली, असे सत्ताधारी म्हणतात; पण हे सारं घडत असताना पोलिसांनी दंगल रोखण्यासाठी नेमके काही केले की नाही, याचीही चौकशी आता गरजेचीच आहे. तरच दंगलीचे खरे मास्टरमाईंड पकडले जातील. सर्वात महत्त्वाचं, गेल्या काही महिन्यांमधील घटनांनी सत्ताधारी असो की विरोधक सार्‍यांनीच अस्वस्थ होण्याची गरज आहे. दंगली पेटवून मतांची ऊब मिळवण्याचे प्रयोग घातकच. या दंगली वणव्यासारख्या भडकल्या, तर मात्र त्या महाराष्ट्रहिताची राखरांगळीच करतील. त्यावेळी मात्र महाराष्ट्र कुणालाही माफ करणार नाही, एवढं निश्चित!

तुळशीदास भोईटे

Back to top button