प्रासंगिक : प्रेमभावनांचा शोध | पुढारी

प्रासंगिक : प्रेमभावनांचा शोध

मानवी जीवन हेच मुळी प्रेम या भावनेभोवती केंद्रित झालेले असते. प्रेम म्हणा वा प्रीती! या शब्दांतील सामर्थ्य किती अद्भुत असते! मानवी मनावर अमर्याद सत्ता गाजविणारी प्रेम ही अमूर्त शक्ती आहे. या शक्तीमुळेच तर दोन जीव रेशमी मुलायम धाग्यांनी बांधले जातात. येत्या 14 फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा होत आहे. यानिमित्ताने…
जागतिक दिनांमध्ये सगळ्यात गाजतो तो 14 फेबु्रवारीचा ‘व्हॅलेंटाईन डे’! तरुणाईच्या गळ्यातला ताईतच तो.

‘प्रीती मिळेल का हो बाजारी,
प्रीती मिळेल का हो शेजारी…’

अशी प्रेमिकांची वणवण असते. व्हॅलेंटाईन हा आंतरराष्ट्रीय दिवस प्रेमासाठी आसुसलेल्या ‘तरुण’ मंडळींसाठी असतो आणि तरुणाईच्या जल्लोषाचा तो प्रतिध्वनी असतो. ‘व्हॅलेंटाईन डे’ आपल्या संस्कृतीत बसत नाही म्हणून मागे कल्लोळ उडाला होता; पण जगातल्या कुठल्याही भागातले तरुण संवेदनशील असतात, हेच खरे.

प्रेम का टिकते नि ते दोघे एकमेकांना का आवडत राहतात, माहित्येय का?
‘मला तू आवडतोस; कारण
मी तुला काही स्पेशल सांगितलं तर
तुला कळतं की, ते स्पेशल आहे…
आणि तू ते लक्षात ठेवतोस
अगदी असंख्य काळ.’ प्रियकर-प्रेयसीच्या नात्यातील उत्कटता व्यक्त करणार्‍या अमृता प्रीतम यांच्या ओळी आहेत.

चादरीला ठिगळ पडले तर टाका घालू शकतो,
आकाश फाटलं तर कसं शिवता येईल?
नवरा मेला तर पुन्हा लग्न करता येते,
प्रियकर गेला तर मग कसं जगायचं?

अमृता-ईमरोज ही एक झकास व्हॅलेंटाईन जोडी होती. रोमिओ-ज्युलियट, हिर-रांझा, बाजीराव-मस्तानी, नल-दमयंती, शिरी-फरहान, लैला-मजनू यांच्याही प्रेमापेक्षा सरस वाटणारी. ती कविता जगली नि तो जीवन रेखाटत गेला. आसक्तीशिवाय परस्परांना तरलतेने आयुष्यभर सांभाळणे किती श्रेष्ठ दर्जाचे असू शकते, हे त्यांच्या प्रेमकथेतून शिकण्यासारखे आहे. प्रियकरांनी स्वप्ने विणण्याच्या गोष्टी करण्यापेक्षा ‘स्वप्ने होण्याचे’ ठरविले पाहिजे. प्रेमाच्या नात्यात गुलाबाचा गंध दरवळत असतो; पाकळ्यांखालील काट्यांनी सावध होत असता, तो मनमुराद लुटायचा असतो. वपूंनी म्हटल्याप्रमाणे, ‘कुणी कुणासाठी त्याग केला याचा हिशेब आला की, आंब्याच्या झाडाने आपला मोहर येण्याचा काळ संपला हे जाणावं.’

मानवी जीवन हेच मुळी प्रेम या भावनेभोवती केंद्रित झालेले असते. प्रेम म्हणा वा प्रीती! या अडीच शब्दांतील सामर्थ्य किती अद्भुत असते! जीवनाच्या वाटचालीत ओळखपाळख नसलेले दोन तरुण जीव एकत्र येतात, त्यांच्या भेटीगाठी होतात. ओळखीपाळखी वाढतात. एकमेकांशी चालता-बोलता विचार देतात, विचार घेतात. दोघांच्या विचारधारा जुळल्या की, ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. मानवी मनावर अमर्याद सत्ता गाजविणारी प्रेम ही अमूर्त शक्ती आहे. या शक्तीमुळेच तर वणवण भटकणारे दोन जीव रेशमी मुलायम धाग्यांनी बांधले जातात.

प्रेमिकांच्या प्रीतीभक्तीमागची (रोमान्स) केमिस्ट्री संशोधकांनी उलगडली आहे. प्रेमात पडलेल्या जोडीदारांच्या मेंदूतला विशिष्ट भाग ‘प्रकाशमान’ होतो आणि त्यांच्या शरीरातील रक्तप्रवाहाची गती वाढते. त्यांच्या तनोमनी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि प्रेमभक्तीस उपयुक्त होतात. डोपामाईन या मेंदूतील शक्तिशाली रसायनाची ती किमया असते. प्रेम ही केवळ भावना नव्हे, तर चांगल्या आरोग्याची ती एक किल्लीदेखील असते.

स्त्री-पुरुष मैत्री म्हटलं रे म्हटलं की, ती ‘सेक्स रिलेशन’साठीच, असं माणसं गृहीत धरतात. म्हणूनच मैत्रीची शान सांभाळणे हे अश्वमेघाचा वारू सांभाळण्याइतके जोखमीचे असते. शन्नांची ‘शहणी सकाळ’ त्यासाठी नजरेसमोर असावी लागते.

सध्याच्या ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’च्या जमान्यात ‘व्हॅलेंटाईन डे’च्या साजरीकरणाला उधाण येणार आहे. तेव्हा, रॉय क्रॉफ्टच्या कवितेत म्हटल्याप्रमाणे :

I Love you, Not Only for what you are, but What I Am With you. ही भावना प्रेमिकांत जेव्हा प्रबळ होईल तो त्यांचा खरा ‘व्हॅलेंटाईन डे’ असेल.

आपल्याला आपले आई-वडील निवडता येत नाहीत; पण मित्र-मैत्रिणी निवडता येतात. त्यामुळे, मित्र-मैत्रिणींचे आपल्या जीवनातले स्थान खूप महत्त्वाचे असते. दु:खात आपल्याला अनेकांची सहानुभूती मिळते; पण आपल्या आनंदात सहभागी होतात, तेच खरे मित्र होत. आपण एखाद्याला किंवा एखादीला त्यांच्या गुणदोषासह स्वीकारतो, तेव्हा ‘मैत्री’ टिकते. तिथे, मग कुठलीही अडचण वा कुठलाही अडथळा बाधा आणू शकत नाही. मनाचा निखळपणा आणि नि:स्वार्थीपणा मैत्रीसाठी आवश्यक असतो. मित्र किंवा मैत्रीण हे आपल्यातीलच चांगुलपणाचे प्रतिबिंब असते. मैत्री निरपेक्ष असावी लागते. परतफेडीची किंवा अन्य अपेक्षा आल्या की, मैत्री बाधित होते. मैत्रीत व्यवहार होतो. तेव्हा खूप सावध असावे लागते.

मैत्री ही व्यापक संकल्पना आहे. मैत्रीला स्थळ, काळ, वेळ, सीमा, असं कुठलंच बंधन नसते. मैत्री माणसाशी होते. तशीच ती प्राण्यांसोबत होऊ शकते. निसर्गातल्या एखाद्या स्थळाशी होऊ शकते. ‘वनचरे’ असलेल्या वृक्ष-वेलींशी मैत्री करणे, ही आजची गरज बनून गेलीय.

मैत्रीत बंधन नसावे, असे वाटत असले तरी नात्यातही मैत्री होऊ शकते, टिकू शकते. मित्र-मैत्रिणीसारखे सहजीवन जगणारे पती-पत्नी म्हणजे आदर्श जोडपे होय. बाप-लेकात आणि माय-लेकीत मित्र-मैत्रिणीचे नाते फोफावू शकते. भावाभावांत नि बहिणींमध्येदेखील मैत्र जुळू शकते. खरं पाहता नात्यात टिकून राहते, ती खरी मैत्री! पण त्यासाठी राग, लोभ, मत्सर, हेवा, द्वेष, भांडणे या अडथळ्यांना पार करण्याची कुवत आपल्यात असली पाहिजे. अशावेळी समझोता करणे आणि क्षमा मागणे ही कला आपल्याकडे असणे गरजेचे ठरते. मनाच्या मोठेपणाचे ते निर्देशांक आहेत.

मनाने निर्भळ असलेल्या लोकांतील मैत्री चिरकाल टिकते. बर्‍याचदा, खरा मित्र (किंवा मैत्रीण) कोण, हे कळायला अवधी लागतो. काही कसोटीचे क्षण आपल्या मैत्रीची पारख करतात. आपले मैत्र त्यावेळी तावूनसुलाखून निघते; पण खरा मित्र (किंवा मैत्रीण) कधी मागे वळून पाहत नसतात. ते आपल्याला शंभर गुन्हे माफ करतात.

या संदर्भात, पाश्चिमात्य देशांतून आलेला आणि आपल्याकडे प्रचलित होऊ घातलेल्या ‘डेटिंग’कडे बघता येईल. परस्परांकडे विविध कारणांनी आकर्षित झालेले युवक-युवती प्रारंभी एकमेकांशी मैत्री करतात. आपसात स्नेहभाव वाढवितात. एकमेकांच्या आवडी-निवडी जोखतात. प्रेमात पडतात आणि सहजीवनाचे म्हणजेच अभिवचन देतात. या सगळ्यांचा प्रारंभ गाठीभेठीने म्हणजेच ‘डेटिंग’ने (ठरलेल्या तारखेला भेटणे) होत असतो. डेटिंग हे वैयक्तिक पातळीवरचे विवाहपूर्व शिबिर असते.

तरुण मंडळी प्रथमत: पे्रमात पडतात ती आकर्षणापोटी! हे आकर्षण भिन्न लिंग, सौंदर्य, बुद्धिमत्ता, स्मार्ट व्यक्तिमत्त्व यातून निर्माण होत असते. जेव्हा ते एकमेकांच्या अधिक जवळ येतात. तेव्हा गुणांसोबतच, त्यांना परस्परांच्या दोषांचीदेखील जाणीव होते. ती होणे अत्यंत निकडीचे असते. कारण, एखाद्याला किंवा एखादीला त्यांच्या गुणदोषासह स्वीकारणे, हे खरे प्रेम असते. त्यासाठी युवक-युवतींमध्ये विचारांची देवाण-घेवाण होणे, विविध विषयांवर संवाद होणे, आवडी-निवडी जोखणे, हे सारे डेटिंगमुळे साध्य होऊ शकते आणि तो त्यांच्या जीवनातला महत्त्वाचा टप्पा ठरतो.

बाळ जन्मण्याआधी, माता किती तरी तयारी करीत असते, तसाच प्रकार सहजीवनाच्या प्रारंभी या प्रीतीभेटीच्या सोहळ्याने होत असतो. लग्नापूर्वी होणार्‍या प्रीतीभेटी या एकप्रकारची ‘प्रीव्हेन्टिव्ह अ‍ॅन्शन’ असते. त्यामुळे सहजीवनात गैरसमज होणे, खटके उडणे, भांडणे होणे हानिकारक प्रकार टळू शकतात. प्रीतीभेटींचा पुढचा टप्पा असतो समुपदेशनाचा आणि विवाहपूर्व शिबिराद्वारे तो पार पाडता येतो. तरुण-तरुणींचे किती तरी प्रश्न अनुत्तरित असतात. कारण, तितके परिपूर्ण ज्ञान त्यांच्याकडे नसते. त्यांच्या उभारत जाणार्‍या मानसिक आणि शारीरिक गरजांना जोजवणारे मार्गदर्शन अनुभवी, तज्ज्ञ मंडळींकडून होणे तितकेच आवश्यक असते. त्यामुळे भावनांच्या भरात टोकाचे निर्णय घेण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. ज्ञान हे कुठल्याही समस्येवर अक्सीर इलाज असते आणि ते सकारात्मक विचारांना प्रवृत्त करीत असते. तारुण्याच्या प्रवाहात असं घडले, तर समाजातील वाढत्या घटस्फोटांच्या प्रमाणाला खचितच आळा बसेल.

Back to top button