Insurance : विमा उतरवतानाचे अर्थगणित | पुढारी

Insurance : विमा उतरवतानाचे अर्थगणित

जयदीप नार्वेकर

एखाद्या कुटुंबामध्ये कमवणारी व्यक्ती एकच असते. मात्र तिचे मध्यम किंवा अल्प वयातच काही बरेवाईट झाले, तर कुटुंब उघड्यावर पडते. अशा कुटुंब प्रमुखांनी विमा उतरवलेला असतो; परंतु तो उतरवताना फार दक्षता घेतलेली नसते. त्यामुळे विम्याचा कुटुंबाला फारसा उपयोग होत नाही. म्हणून प्रत्येकाने आपला विमा उतरवताना काही गोष्टींची दक्षता घेतली पाहिजे. ( Insurance )

संबंधित बातम्या 

आपला विमा कोणत्या योजनेखाली उतरवला जात आहे, त्याचे लाभ काय आहेत याची बारकाईने चौकशी करूनच विमा उतरवला पाहिजे. याद़ृष्टीने काही ठोकताळे सांगितले जात असतात. विमा उतरवताना आपले जेवढे उत्पन्न असेल, त्याच्या बारापट अधिक रकमेचा विमा उतरवला पाहिजे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला दरमहा दहा हजार रुपये वेतन असेल तर त्याने किमान 1.5 लाखाचा विमा उतरवला पाहिजे. मात्र या रकमेचा हिशोब करताना आपल्या वेतनातून या विम्याचा किती हप्ता भरावा लागेल? तो हप्ता आणि अन्य गुंतवणुकीचे हप्ते वजा जाता आपल्या हातात काय पडेल, याचाही विचार केला पाहिजे.

विमा उतरवताना विमेदार विवाहित आहे की अविवाहित, विवाहित असल्यास मुले किती आहेत आणि कुटुंबातल्या आणखी काय जबाबदार्‍या आहेत, याचाही विचार केलेला असावा.

कोणालाही आपल्या मृत्यूचा विचार करणे आवडत नाही. परंतु आपले अकाली निधन झाले तर कुटुंबाची गुजराण होण्यासाठी किती रकमेची गरज भासेल, याचा हिशोब केला पाहिजे.

विम्याची मुदत किती असावी, यावरही काही हिशोब सांगितला जातो. विमा उतरवताना विमेदाराचे वय किती आहे, यावर ही मुदत अवलंबून असते.

समजा, विमा उतरवताना विमेदाराचे वय 40 वर्षे आहे आणि तो 60 व्या वर्षी निवृत्त होणार आहे. अशा वेळी 60 उणे 40 म्हणजे 20 वर्षे मुदतीचा विमा उतरवावा.

विमेदाराच्या आकस्मिक मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला क्लेम सादर करताना कसलाही त्रास होऊ नये आणि क्लेम नाकारण्याची विमा कंपनीची प्रवृत्ती होता कामा नये, याचा विचार करून कागदपत्रे पूर्ण केलेली असली पाहिजेत.

विमा कंपनी कोणती निवडावी याचेसुद्धा काही निकष आहेत. ज्या कंपन्या क्लेमची रक्कम देण्याबाबत तत्पर असतील, त्यांच्याकडूनच विमा उतरवावा. याबाबतची माहिती आपल्याला त्या-त्या कंपन्यांच्या संकेतस्थळावर मिळते.

आपली विम्याची रक्कम ठरवताना आपल्या कुटुंबांच्या गरजांचा जसा विचार करावा लागतो तसाच रुपयाची घटती किंमत हीही विचारात घ्यावी लागते.

आज आपला दरमहा कौटुंबिक खर्च किती आहे, हे विचारात घेऊन रुपयाची घटती किंमत आणि चलनवाढ यांच्याशी त्याचा मेळ घालून येणार्‍या वर्षांमध्ये कुटुंबाला किती खर्च लागेल, हे ठरवता आले पाहिजे.

Back to top button