शारजातून आलेल्या १०० प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर घरी सोडले
नागपूर; पुढारी वृत्तसेवा: नागपुरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या शंभर प्रवाशांची ‘आरटी-पीसीआर चाचणी ‘ चे निगेटिव्ह रिपोर्टनंतर प्रवाशांना घरी सोडण्यात ( निगेटिव्ह रिपोर्टनंतर सोडले घरी ) आले. रविवारी (दि.५) रोजी सकाळी पावणेसात वाजता हे प्रवाशी शारजा-नागपूर आंतरराष्ट्रीय विमान तळावर उतरले होते.
ओमायक्रॉनचा नवीन व्हेरियंट राज्यात आढळल्याने सर्वत्र वातावरण चिंताग्रस्त होते. याच दरम्यान नागपुरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शारजा येथून जवळपास १०० प्रवाशी उतरले. यामुळे तणावाच्या वातावरणात महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी एक-एक करीत १०० प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी केली. तब्बल दीड ते दोन तास नमुने घेतले.
याशिवाय जोपर्यंत अहवाल येत नाही, तोपर्यंत प्रवासी विमानतळावरच थांबले होते. प्रवाशांच्या मनात धास्ती होती. मात्र, अहवाल आल्यानेत आरोग्य यंत्रणेने सुटकेचा निःश्वास सोडला. कारण तपासणीत सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यांना ओमायक्रॉनची बाधा नसल्याचे स्पष्ट झाले. यानंतर त्यांना घरी साेडण्यात आले.
यावेळी आप्तस्वकीयांना घेण्यासाठी नातेवाइकांनी विमानतळावर गर्दी केली होती. शारजा विमानातून आलेल्या प्रवाशांना विमानतळाच्या आतल्या परिसरात थांबवले होते. चाचण्या निगेटिव्ह आल्यामुळे साऱ्यांना सोडले. मात्र, प्रवाशांचे राहण्याचे ठिकाण, संपर्क मोबाईल नंबर आदींची माहिती घेण्यात आली. यानंतरच त्यांना घरीच विलगीकरणात राहण्याची अट घालण्यात आली.
तीन दिवसानंतर पुन्हा सर्व प्रवाशांशी संपर्क करण्यात येणार आहे. पुढील चाचणीत कोविड तपासणीनंतर नियमाप्रमाणे उपचार सुरू करण्यात येतील. आठ दिवसानंतर पुन्हा सर्व १०० प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी केली जाईल. पॉझिटिव्ह आढळल्यास आमदार निवासातील कोविड सेंटरमध्ये ठेवले जाणार आहे.
९५ प्रवासी शारजाला रवाना
ओमायक्रॉनचा नवीन व्हेरियंट राज्यात आढळल्याने केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, महापालिकेच्या वतीने विमानतळावर आज चाचणीसाठी संपूर्ण व्यवस्था केली होती. नागपूर ते शारजा ९५ प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना चाचणीनंतरच विमानात प्रवेश देण्यात येत होते. आंतरराष्ट्रीय विमानातळावर येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी केली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.
शासनाच्या सूचनेनुसार, परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. निगेटिव्ह अहवालानंतर प्रवाशांना गृहविलगीकरणात राहण्याची सूचना केली. त्यांच्यावर महापालिकेच्या पथकाची नजर असेल. हे पथक दुसऱ्या, चौथ्या व सातव्या दिवशी संबंधित प्रवाशांच्या घरी जाऊन माहिती घेणार आहे. प्रवाशांचा अहवाल पॉझिटिव्ह येताच त्यांना वैद्यकीय उपचारासाठी पाठविण्यात येईल असेही यावेळी सांगितले.
हेही वाचलंत का?