केजरीवालांना तुरुंगात मारण्याचा प्रयत्न : 'आप'चा गंभीर आरोप
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तिहारच्या तुरुंगात हळूहळू मारण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप आपचे नेते सौरव भारद्वाज यांनी केला. दिल्लीत आज (२० एप्रिल) पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगात इन्सुलिन आणि दररोज डॉक्टरांचा सल्ला मिळावा, अशी मागणी केली होती. या मागणीचा निकाल दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयाने राखीव ठेवला. त्यानंतर सौरव भारद्वाज यांनी हा आरोप केला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मद्य धोरण गैरव्यवहारप्रकरणी तिहार तुरुंगात आहेत. त्यांना तुरुंगात घरचे जेवण करण्याची परवानगी मिळाली. त्यामुळे ते तुरुंगातही घरचे जेवण करतात. यादरम्यान ईडीने त्यांच्यावर आरोप केले होते की, “केजरीवाल रक्तातील साखर वाढण्यासाठी तुरुंगात आंबे आणि मिठाई खातात.” ईडीच्या या आरोपानंतर आपचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. केजरीवाल यांनी शुक्रवारी (१९ एप्रिल) रोजी तुरुंगात इन्सुलिन आणि दूरदृश्यप्रणालीद्वारे डॉक्टरांशी सल्लामसलत करण्याची मागणी न्यायालयाकडे केली. या सुनावणीचा निकाल दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयाने राखून ठेवला आहे. त्यामुळे केजरीवाल यांनी मधुमेहाचा त्रास असून त्यांना तुरुंगात इन्सुलिन आणि डॉक्टरांचा सल्लाही मिळत नसल्याची भावना आपच्या नेत्यांची झाली.
आज पत्रकार परिषदेत आपचे नेते सौरव भारद्वाज म्हणाले की, “तिहार तुरुंगात केजरीवाल यांना हळू हळूहळू मारण्याचे षडयंत्र आहे, उच्च मधुमेहाच्या रुग्णाला औषध नाही मिळाले तर शरीराचे अवयव खराब होण्याची भीती असते. अरविंद केजरीवाल यांच्यासोबतही असे होऊ शकते, असे झाले तर नायब राज्यपाल विनय सक्सेना किडनी देणार नाहीत.” त्याचबरोबर भारद्वाज यांनी केजरीवालांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण सतत वाढत असल्याचे अहवालही वाचून दाखवले.
हेही वाचा :
- Arrest of Arvind Kejriwal: केजरीवाल तुरुंगात काय खातात? न्यायालय करणार तपासणी
- ‘मी दहशतवादी नाही’ : केजरीवालांचा तिहार कारागृहामधून नवा संदेश
- Arvind Kejriwal: केजरीवालांच्या याचिकेवरील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला, तुरुंग प्रशासन, ED ला नोटीस