Panaji Murder Case : एक फूल दो माली! लगट जीवावर बेतली; रेहबर खानचा खून प्रेमाच्या त्रिकोणातून | पुढारी

Panaji Murder Case : एक फूल दो माली! लगट जीवावर बेतली; रेहबर खानचा खून प्रेमाच्या त्रिकोणातून

पणजी; पुढारी वृत्तसेवा : पिळर्ण, पर्वरी येथील ऑडिट भवनजवळ संशयास्पद व जखमी अवस्थेत आढळलेला मृतदेह रेहबर खान (वय २१, उत्तरप्रदेश ) याचा असल्याचा आणि त्याचा खून प्रेमाच्या त्रिकोणातून झाल्याचा प्रथमदर्शनी अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

‘एक फुल दो माली’ प्रकरणातून खून झाल्याचा संशय असून या खून प्रकरणातील मुख्य संशयित विकास यादव फरारी आहे. तर खून प्रकरणात सहभाग असलेल्या खतेश कांदोळकर, सुमन बरीक सचिन सहानी, तनय कांदोळकर आणि सचिन सिंग (सर्व रा.कांदोळी) या पाच संशयितांच्या मुसक्या पर्वरी पोलिसांनी आवळल्या आहेत. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

रेहबर हा सलूनमध्ये काम करायचा .पर्वरी पोलिसांच्या पीसीआर रॉबर्ट गाडीतील पोलिसांना मंगळवारी पहाटे २ च्या सुमारास गस्तीवेळी ऑडीट भवन जवळ रस्त्याच्या कडेला त्याचा मृतदेह आढळला होता. शिवाय त्याची ओळख पटेल अशी कोणतीही खूण किंवा कागदपत्रे घटनास्थळावर पोलिसांना मिळाली नव्हती. पर्वरी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक जितेंद्र नाईक यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह गोमेकॉत पाठवून दिला होता. मृत रेहबर याच्या शरीरावर काही जखमा होत्या. या जखमा खूनाच्या हेतूने मारहाण केल्याच्या की हीट अॅण्ड रन अपघातामुळे झाल्या होत्या हे स्पष्ट झाले नसल्याने बुधवारी मृतदेहाचे गोमेकॉत शवविच्छेदन करण्यात आले. त्यात हा प्रकार हिट अँड रनचा नसून खूनच असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस आले आणि तपासाची चक्रे जोरात सुरू झाली.
यावेळी रेहबर याची ओळख पटली आणि पोलिसांच्या चौकशीत प्रेमाचा त्रिकोण पुढे आला.

फरार असलेल्या विकास यादव याच्या प्रेयसीशी रेहबर याची जवळीक वाढल्याने अस्वस्थ झालेल्या विकास यादवने रेहबर याचा खून केला असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस पोचले आहेत. या खून प्रकरणातील पाच संशयितांना पोलिसांनी अटक केली असून विकास यादवच्या मागावर वेगवेगळी पोलीस पथके पाठवण्यात आली आहेत. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक विश्वेश कर्पे, निरीक्षक जितेंद्र नाईक वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button