Rajya Sabha Election | १५ राज्यांतील राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणूक जाहीर | पुढारी

Rajya Sabha Election | १५ राज्यांतील राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणूक जाहीर

पुढारी ऑनलाईन : १५ राज्यांमधील राज्यसभेच्या ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार असल्याची घोषणा भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) आज सोमवारी केली. यासाठी ८ फेब्रुवारी रोजी अधिसूचना जारी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी असेल. यासाठी २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ दरम्यान मतदान होईल. तर त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी होईल. (Rajya Sabha Election)

पंधरा राज्यांमधील ५६ खासदार एप्रिलमध्ये निवृत्त होत आहेत. यात महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री नारायण राणे, परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन आणि प्रकाश जावडेकर (सर्व भाजप) त्याचप्रमाणे वंदना चव्हाण (राष्ट्रवादी कॉंग्रेस), अनिल देसाई (शिवसेना) आणि कुमार केतकर (कॉंग्रेस) हे सहा खासदार निवृत्त होणार आहेत.

१३ राज्यांतील ५० राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी तर २ राज्यांतील उर्वरित ६ सदस्यांचा कार्यकाळ ३ एप्रिल रोजी संपणार आहेत. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, कर्नाटक, उत्तराखंड, छत्तीसगड, ओडिशा, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांत राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत. राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो.

२०२४ मध्ये राज्यसभेतील तब्बल ६८ खासदार निवृत्त होत असले तरी पहिल्या टप्प्यात एप्रिलमध्ये निवृत्त होणाऱ्या खासदारांची संख्या सर्वाधिक म्हणजे ५६ आहे. त्यात महाराष्ट्र , गुजरात आणि मध्यप्रदेशातून प्रत्येकी दोन तर राजस्थान, ओडिशा आणि कर्नाटक मधून प्रत्येकी एक असे नऊ केंद्रीय मंत्री देखील निवृत्त होत आहेत. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया, माहिती तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर, केंद्रीय मत्स्य व पशुपालन मंत्री पुरुषोत्तम रूपाला, राज्यमंत्री एल मुरुगन, परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन, सूक्ष्म लघु आणि मध्यम विभागाचे मंत्री नारायण राणे या आठ मंत्र्यांच्या राज्यसभा खासदारकीची मुदत २ एप्रिलला तर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या खासदारकीची मुदत ३ एप्रिलला संपुष्टात येत आहे.

या व्यतिरिक्त निवृत्त होणाऱ्यांमध्ये माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, कॉंग्रेसचे नेते सय्यद नासीर हुसेन, समाजवादी पक्षाच्या जया बच्चन, भाजपचे मुख्य प्रवक्ते अनिल बलुनी, राष्ट्रीय जनता दलाचे मनोजकुमार झा, बिहारचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार मोदी (भाजप), कॉंग्रेसचे डॉ. अभिषेक मनू सिंघवी या राज्यसभेतील बड्या चेहऱ्यांचाही समावेश आहे.

याआधी निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी राज्यसभेच्या दिल्लीच्या तीन जागांसाठी निवडणुका जाहीर केल्या होत्या. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह, नारायण दास गुप्ता आणि सुशील कुमार गुप्ता यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने निवडणुका झाल्या. यातील संजय सिंह आणि नारायण दास गुप्ता पुन्हा राज्यसभेवर निवडून आले आहेत. तर सुशील कुमार गुप्ता यांच्याऐवजी स्वाती मालीवाल यांना खासदारकीची संधी मिळाली आहे.

आंध्र प्रदेशातील ३, बिहार ६, छत्तीसगड १, गुजरात ४, हरियाणा १, हिमाचल प्रदेश १, कर्नाटक, ४, मध्य प्रदेश ५, महाराष्ट्र ६, तेलंगणा ३, उत्तर प्रदेश १०, उत्तराखंड १, पश्चिम बंगाल ५, ओडिशा ३ आणि राजस्थानमधील राज्यसभेच्या ३ जागांचा समावेश आहे. (Rajya Sabha Election)

 हे ही वाचा :

 

Back to top button