महाराष्ट्रात परत येण्यास इच्छूक नाही, राष्ट्रीय राजकारणात खुश : विनोद तावडे | पुढारी

महाराष्ट्रात परत येण्यास इच्छूक नाही, राष्ट्रीय राजकारणात खुश : विनोद तावडे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : २०१४ नंतर भाजपमध्ये रिरायटिंग सुरू आहे. आपण महाराष्ट्रात परत येण्यास इच्छूक नाही, राष्ट्रीय राजकारणात खुश आहे. ओन्ली राष्ट्र असे स्पष्ट करतानाच काँग्रेस व इतर पक्षांनी दिलेल्या गॅरंटीपेक्षा लोकांनी मोदी गॅरंटीवर विश्वास ठेवला, असे प्रतिपादन भाजपचे राष्टीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी माध्यमांशी बोलताना केले.

यापुढेही भाजपचा कार्यकर्ता म्हणून जे काम पक्षाने दिलं, ते मी करेन. मध्यप्रदेशमध्ये नेतृत्व बदलाबाबत बोलताना तावडे म्हणाले, मोहन यादव हे तीन टर्मचे आमदार आहेत. ते आज पुढे आलेत म्हणून अपरिपक्व आहेत, असे नाही. नवीन व्यक्ती आली तर नवीन वाटणारचं. मोहन यादव हे यादव असण्यापेक्षा ते निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. मात्र, प्रस्तावित नाव सोडून ते नाव का आलं? असं अनेकांना वाटत असेल. पण पक्षाने दिलेलं काम करावंच लागेल, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवं, असे आवाहनही त्यांनी यानिमित्ताने आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत इच्छुकांना दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी लोकांना अधिक खरी वाटली, म्हणून लोकांनी अधिक विश्वास दाखवला. हा निवडणूक निकालाचा मतितार्थ असून इतर पक्षांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास आकर्षक योजनांची गॅरंटी देतानाच मागील पाच -सहा वर्षात काय केलं? यावरही प्रत्यक्ष मतदान करताना मतदार भर देत असल्याचे दिसत आहे. छत्तीसगड राज्यातही भाजपच्या स्ट्रॅटेजीमध्ये मोदी गॅरंटी प्रभावी ठरली आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, भाजप अखिल भारतीय स्तरावर २०२४ च्या निवडणुकीसोबत २०४७ च्या स्वातंत्र्याच्या शताब्दी महोत्सवासाठी कामाला लागल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

आगामी निवडणुकीच्या दृष्टीने जागावाटप बाबतीत अजून कुठलीही चर्चा नाही, डिसेंबर ते जानेवारीच्या काळात ती होईल, असे सांगताना लोकसभेत दक्षिण भारतात देखील भाजप चांगले यश मिळवेल. व तेलंगणा,कर्नाटकमधील जागा जिंकू. मागीलवेळी बिहारला १६ जागा होत्या आता यात आणखी आठ दहा जागा वाढतील. बिहारमध्ये चमत्कार होणार असून दक्षिण भारताच्या निवडणुकांवर विशेष लक्ष असणार आहे, असेही ते म्हणाले.

विद्यार्थी परिषद चांगले दिवस आहेत का, याकडे लक्ष वेधले असता संघ, भाजयुमो सर्वाना चांगले दिवस आहेत. विद्यार्थी परिषदेचं काम २० वर्षात प्रचंड वाढले आहे. अनेक मोठ्या पदावर असलेले विद्यार्थी परिषदेतून आले आहेत. संघ परिवारातून अनेक जण संघटन पातळीवर जात असल्याने सगळ्यांसाठी अच्छे दिन आहेत. सर्व लोकसभा मतदारसंघाचा अभ्यास केला जात आहे. त्यावर काम करून ५० टक्क्यापेक्षा कमी मते का मिळाली ? यावर मागील आठ महिन्यांपासून काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यात जागा फॉर्म्युला संबंधी छेडले असता अजून फर्म्युला ठरला नाही. आमदार म्हणून निवड करताना, तिकीट वाटप होताना सर्व बाबी बारकाईने पाहिल्या जातात. परफॉर्मन्स असणारा लोकप्रतिनिधी असणे महत्वाचे असते, यावर तावडे यांनी भर दिला.

हेही वाचा :

Back to top button