Pune News : सिंहगडच्या वाड्या-वस्त्यांत पाण्यासाठी वणवण | पुढारी

Pune News : सिंहगडच्या वाड्या-वस्त्यांत पाण्यासाठी वणवण

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत राबविण्यात आलेली पाणी योजना फसल्याने कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला आहे. त्यामुळे सिंहगड किल्ल्याच्या मोगरवाडी, खामगाव मावळसह वाड्या-वस्त्यांतील हजारो रहिवाशांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे नव्याने मंजूर केलेली जलजीवन मिशन योजना तरी दर्जेदारपणे राबविण्यात यावी, असे साकडे नागरिकांनी प्रशासनाला घातले आहे.

राष्ट्रीय पेयजल योजनेतून खडकवासला धरणातून थेट पाणी उचलून गडाच्या पायथ्याला असलेल्या मोगरवाडी, खामगाव मावळ व वाड्या-वस्त्यांत नेण्यात आले आहे. मात्र निकृष्ट दर्जाची प्लॅस्टिकची पाइपलाइन फुटल्याने तसेच मोटार बंद पडल्याने गेल्या पाच महिन्यांपासून पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे किल्ल्याच्या डोंगरदर्‍यांतील दहा हजारांवर नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने महिला, नागरिक वैतागले आहेत. सर्वात गंभीर स्थिती मोगरवाडी , माळवाडी, चांदेवाडी येथे आहे. येथील रहिवाशांना सार्वजनिक विहिरींवर, तसेच कोठरजाई तळ्यातील दूषित पाण्यावर तहान भागवावी. माणंसासह जनावरांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

खामगाव मावळच्या सरपंच संतोषी दारवटकर म्हणाल्या, ‘निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अडीच कोटी रुपयांची पाणी योजना पाच महिन्यांपासून बंद आहे. आता जलजीवन मिशन योजनेतून नवीन योजना मंजूर करण्यात आली आहे. प्लॅस्टिकऐवजी लोखंडी पाईपलाईन टाकून दर्जेदारपणे योजना राबविण्यात यावी.’ स्वातंत्र्यानंतर प्रथमच सिंहगडच्या टंचाईग्रस्त दुर्गम भागात खडकवासल्याचे पाणी पोहोचले म्हणून येथील रहिवाशांनी आनंदोत्सव साजरा केला. मात्र, पावसाळ्यात पाणी योजना बंद पडली.
विहीर आदी कामे अर्धवट असताना योजना पूर्ण झाल्याचे दाखवून अधिकारी व ठेकेदाराने कोट्यवधी रुपये लाटले, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

जलजीवन मिशन योजनेंतर्गत राबविण्यात येणार्‍या योजनेसाठी उपलब्ध निधीतून आवश्यक ठिकाणी लोखंडी पाईपलाईन टाकण्यात येणार आहेत. जादा अंतर असल्याने दोन टप्प्यांत पंपिग करावे लागते. त्यामुळे योजना सुरळीत सुरू राहण्यासाठी स्थानिक कर्मचार्‍याला प्रशिक्षण दिले जाणार आहे.

-एस. ए. खताळ, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद

पहिल्या योजनेतील त्रुटी दूर करून नवीन योजना अधिक दर्जेदारपणे राबविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. पाइपलाइन व इतर सर्व कामे अधिक चांगल्या प्रकारे व्हावीत. भविष्यात पाणीपुरवठा बंद होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात यावी.

– नवनाथ पारगे, माजी सदस्य, जिल्हा परिषद

हेही वाचा

Back to top button